“धनगर एसटी आरक्षण- ओबीसी चे संरक्षण” , यासाठी २९ तारखेला “चलो जेजुरी” चा नारा: नवनाथ पडळकर

प्रस्थापित समाज आता थेट ओबीसी मधूनच आरक्षणाची मागणी करत असताना अठरा पगड जाती जमाती मधील भयभीत, चिंतित झालेल्या कार्यकर्त्यांची खदखद जाणून घेण्यासाठी धनगर, ओबीसी, बहुजन, भटके विमुक्त, जाती जमाती उपेक्षित वंचिताच्या प्रश्नांवर वाचा फोडणारा, त्यांची शक्ती एकवाटणारा हा मेळावा असेल, ” प्रस्थापित विरुद्ध विस्थापित” या धोरणाने प्रेरित असा हा मेळावा आहे.
विशेष म्हणजे धनगर समाजाची एस टी आरक्षण अंमलबजावणी 70 वर्षापासून प्रलंबित ठेवली आहे. बहुजन समाजाचे अस्मिता असलेले महाराजा यशवंतराव होळकर, सुभेदार मल्हारराव होळकर, शिवा काशिद, जीवा महाले यांची स्मारके ही राज्य व राष्ट्रीय स्मारके व्हावीत यावर देखील या मेळाव्यात विचारमंथन होणार आहे.
या सामाजिक वास्तवासोबत ओबीसी भटक्या विमुक्तांचा सत्तेमधील म्हणजेच निर्णय प्रक्रियेमधील न्याय वाटा का नाही यावर देखील उहापोह होणार आहे. राज्यातील बदलती सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता उपेक्षित गरीब कष्टकरी शेतकरी कामगार पशुपालक मेंढपाळ भूमिपुत्र यांचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत तर शासकीय नोकर भरती मधील कंत्राटीकरण, अपहार, नोकरभरती टाळली जाणे , बिंदूनामावली सारखे नियम डावलून होणारी नोकरभरती, यामुळे शिकलेला , बेरोजगार तरुण वर्ग निराश झाला आहे.
मेंढपाळ आणि भटक्या जाती जमातीवरील वाढते सामूहिक हल्ले आणि त्यावर आवाज उठविणे,चराऊ कुरणे आणि वन विभागाचा त्रास, परप्रांतीय मच्छीमारांचे संकट, ऊसतोड कामगार प्रश्न आदी विषयावर या मेळाव्यातून आवाज उठविला जाऊ शकेल.
महाराजा यशवंतराव होळकर यांची पुण्यतिथी व संत बाळुमामाची जयंती साजरी करतानाच या औचीत्यावर विशेष गोड बातमी दिली जाणार आहे तरी या कार्यक्रमास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे मल्हारगड
दसरा महामेळावा संयोजन समितीचे संस्थापक अध्यक्ष नवनाथ पडळकर यांनी जाहीर आवाहन केले आहे.
ऐक्याची ज्योत पेटविण्यासाठी अखंड महाराष्ट्रातील बहुजन समाज बांधव राज्यातील कानाकोपऱ्यातून एकवरणार आहेत. धनगर, ओबीसी, बलुतेदार, अलुतेदार, भटके, विमुक्त जाती जमातीचे सामाजिक कार्यकर्ते सोन्याच्या जेजुरीमध्ये श्री खंडेरायाच्या साक्षीने ऐक्याची मशाल पेटवून महाराष्ट्रातील नव्या सामाजिक समीकरणाची मुहूर्तमेढ रोवणार आहेत.