कौटुंबिक न्यायालयाच्या भग्न इमारतीत दुभंगलेली मने व कुटुंब परत जुळवण्याचे अवघड काम न्यायाधीश नेत्रा कंक यांनी सहजपणे केले-जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी

अहमदनगर दि. १६ मे (प्रतिनिधी) – योग्य न्याय निवाड्यासाठी न्यायाधीश परिपक्व, समजूतदार व अभ्यासू असावा. हे सारे गुण कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांच्यात आहेत. नवे न्यायाधीश बहुदा पहिल्या नियुक्तीत चाचपडतच असतात. नेत्रा कंक यांनी आपल्या पहिल्याच नियुक्तीत फार उत्कृष्ट काम केले आहे. कुटुंब व्यवस्था अबाधित राहण्यासाठी कौटुंबिक खटले त्यांनी नाजूकपणे हाताळले आहेत. जुन्या कोर्टात कौटुंबिक न्यायालयाची इमारत असल्याने भग्न झाली आहे. अशा भग्न इमारतीती दुभंगलेल मने व कुटुंब परत जुळवण्याचे अवघड काम न्यायाधीश नेत्रा कंक यांनी सहजपणे केले आहे. न्यायदान प्रक्रियेत वकिलांचे बहुमोल योगदान असते. कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे काम व उपक्रम कौतुकास्पद आहे. या न्यायालयाचे जे प्रलंबित समस्या व प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सहकार्य करू, असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी केले.
कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नेत्रा कंक यांची नुकतीच ठाणे येथे बदली झाली आहे. यानिमित्त कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात जिल्हा न्यायाधीश सुनील गोसावी यांच्या हस्ते न्या.कंक यांचा सत्कार करून भारावलेल्या वातावरणात निरोप देण्यात आला. यावेळी कामगार न्यायालयाचे न्यायाधीश अभिजित देशमुख, कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.शिवाजी कराळे, उपाध्यक्ष ऍड.लक्ष्मण कचरे, शहर वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड.संजय पाटील, लॉयर्स सोसायटीचे अध्यक्ष ऍड.भूषण बर्हाटे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात कौटुंबिक न्यायालयाच्या समुपदेशक सुषमा बिडवे, पोलीस कर्मचारी श्री.फाळके व पूजा पवार यांचीही बदली झाल्याने त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. न्या.नेत्रा कंक म्हणाल्या, न्यायाधीश झाल्यावर पहिलेच पोस्टिंग असल्याने मनावर मोठे दडपण होते. पण येथील मनमोकळे वातावरण, सहकार्य करणारे वकील व कर्मचार्यांमुळे दडपण दूर झाले. येथे खूप काही शिकण्यास मिळाले, योग्य न्यायनिवाडा करता आला यासाठी न्यायदेवतेला धन्यवाद देता. येथील वकील संघ खूप उपक्रमशील आहे. समुपदेशक सुषमा बिडवे यांनी खूप सहकार्य केले. त्यामुळेच चांगले काम करू शकले. या माहेरचा आशीर्वाद घेवून सासरी जात आहे. हे माहेर कधीच विसरणार नाही. न्या.अभिजित देशमुख म्हणाले, न्या.नेत्रा कंक यांचे न्यायदानाचे काम अव्वल दर्जाचे आहे. पहिलेच पोस्टिंग असूनही त्यांनी केलेल्या कामातून बेंच मार्क उभारला आहे. न्या.कंक यांच्या जागेवर जे न्यायाधीश येतील त्यांना ते दिशादर्शक राहील.
प्रास्ताविकात ऍड.शिवाजी कराळे म्हणाले, कौटुंबिक न्यायालयात न्या.नेत्रा कंक व समुपदेशक सुषमा बिडवे यांचा पक्षकारांना खूप आधार होता. घटस्फोटापर्यंत गेलेले कुटुंब येथे पुन्हा जोडले गेले आहेत.न्या.कंक यांनी वकिलांना व पक्षकारांना खूप सहकार्य केले. कौटुंबिक न्यायालय जुन्या कोर्टात असल्याने येथे खूप अडचणी व असुविधा आहेत. त्या सोडवत न्या.कंक यांनी येथे मुलभूत बदल व विस्तार केला आहे. या कोर्टात कर्मचार्यांची खूप कमतरता आहे. त्यासाठी जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील गोसावी यांनी सहकार्य करावे. न्या.कंक यांची ही पहिलीच पोस्टिंग असल्याने त्यांनी नगरला माहेर समजावे. त्यांनी हे माहेर कायम स्मरणात ठेवावे. यावेळी शहर वकील संघाचे माजी अध्यक्ष ऍड.भूषण बर्हाटे, ऍड.मुकुंद पाटील, ऍड.लक्ष्मण कचरे, ऍड.रमेश कराळे, रोटरी असोसिएशनचे ऍड.विक्रम वाडेकर, ऍड. शारदा लगड, ऍड.निर्मला चौधरी, ऍड.रेणू कोठारी, ऍड.अर्चना सेलोत आदींनी आपल्या मनोगतातून न्या. कंक व समुपदेशक सुषमा बिडवे यांच्या कार्याचे कौतुक केले. सुषमा बिडवे यांनी मनोगतातातून सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. यावेळी अनेकांचे डोळे पाणावले. सूत्रसंचालन वकील संघटनेच्या सचिव ऍड.अनिता दिघे यांनी केले. विशेष सरकारी वकील सुरेश लगड यांनी आभार मानले. यावेळी कौटुंबिक न्यायालय वकील संघाचे ऍड.सुचेता बाबर, एम. बी. आंबेकर, ऍड.करुणा शिंदे, शहर वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड.राजाभाऊ शिर्के, ऍड.राजेश कावरे, ऍड.गोरख तांदळे, ऍड.सुधीर भागवत, ऍड. राजेंद्र सेलोत आदींसह वकील उपस्थित होते.