सामाजिक

उपवर्गीकरण रद्द करा, संविधान वाचवा ९ ऑगस्ट क्रांतीदिनी आंबेडकरी समाज क्रांती घडविणार! अहिल्यानगरात समस्त आंबेडकरी समाजाचा विराट मोर्चा! उपवर्गीकरणाविरोधात तीव्र भूमिका, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 12 जुलै (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ बुद्ध विहार, सिद्धी बाग येथे समस्त आंबेडकरी समाजाच्या अनुयायांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला. तसेच संविधानाच्या मूलभूत तत्त्वांना बाधा पोहोचविणाऱ्या निर्णयांविरोधात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
बैठकीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त अहिल्यानगर शहरात विराट संविधान बचाव मोर्चा काढण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या मोर्चामध्ये जिल्हाभरातील समस्त आंबेडकरी समाज, विविध सामाजिक संघटना, शासकीय सेवानिवृत्त कर्मचारी तसेच संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक, माळीवाडा, पांचवीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, टेली खुंट, नेतासुभाष चौक, चितळे रोड, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मार्गे नीलक्रांती चौक येथे समारोप होणार आहे.
बैठकीत उपस्थित वक्त्यांनी सांगितले की, भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा अधिकार हा संसदेचा विषय आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना त्या संदर्भातील अधिकार देणारा निर्णय दिल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या निर्णयामुळे समाजात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असून, विविध जातींमध्ये संघर्षाचे वातावरण तयार होऊ शकते, अशी चिंता व्यक्त करण्यात आली.
तसेच भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या ५९ अनुसूचित जातींच्या यादीत कोणताही बदल करण्याचा अधिकार केवळ संसदेलाच असल्याचे मत बैठकीत मांडण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय रद्द होईपर्यंत संविधान व सामाजिक न्यायाच्या संरक्षणासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
बैठकीस समस्त आंबेडकरी समाजाचे अनुयायी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या संविधान बचाव मोर्चात जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे