धर्मनिरपेक्षता विचारसरणीने काम करणारे मौलाना अब्दुल कलाम आझाद थोर स्वातंत्र्यसेनानी होते – किरण काळे काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग आझाद यांचे स्मारक नगरमध्ये व्हावे यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार

अहमदनगर ११ नोव्हेंबर (प्रतिनिधी): देशाचे पहिले शिक्षणमंत्री राहिलेल्या मौलाना अब्दुल कलाम आझाद हे धर्मनिरपेक्षता विचारसरणीचे होते. महात्मा गांधी यांच्या बरोबर खिलाफत चळवळीच्या माध्यमातून संपर्कात आल्यानंतर ते गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाले होते. मौलाना अब्दुल आझाद हे काँग्रेसचे मोठे नेते. आजही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनामध्ये त्यांचे स्थान अग्रस्थानी असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.*
आझाद यांच्या जयंती दिनानिमित्त अहमदनगर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी काळे बोलत होते. यावेळी अल्पसंख्यांक काँग्रेसचे नेते अनिस चुडीवाला, शहर जिल्हा महासचिव इमरान बागवान, युवक काँग्रेस अध्यक्ष प्रवीण गीते, शहर जिल्हा खजिनदार मोहनराव वाखुरे, ब्लॉक काँग्रेसचे हनीफ मोहम्मद जागीरदार, युवक काँग्रेस शहर उपाध्यक्ष गौरव घोरपडे, शुभम कुचेकर, पंकज वैराळ, गुड्डू साठे, आकाश गायकवाड, विकास उमाप आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी काळे म्हणाले की, मुस्लिम अल्पसंख्यांक समाजाबरोबरच सबंध भारतवासीयांना अभिमान वाटावा अशा पद्धतीचे बहुमोल योगदान देशाच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आझाद यांचे राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळीतील कामा बरोबरच काँग्रेसचे नेतृत्व करत असून देखील त्यांना उर्दू कविता करण्याचा छंद होता. असहकार आंदोलनात त्यांनी वठविलेली भूमिका ही देशासाठी महत्त्वाची होती.
शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले काम देखील उल्लेखनीय आहे. देशाचे शिक्षण मंत्री होण्याबरोबरच जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये देखील त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. नगरमध्ये त्यांचे स्मारक व्हावे अशी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे पक्षाच्यावतीने पाठपुरावा केला जाईल.