राजकिय
ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील ‘ग्रीन सिटी’ मोहिमेअंतर्गत वृक्षलागवड उपक्रमाचा शुभारंभ

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. १ मे : शहरे झपाट्याने विस्तारत असताना वाढते प्रदूषण नागरिकांच्या जीवनावर गंभीर परिणाम करत आहे. बदलत्या जीवनशैलीची मोठी किंमत समाजाला मोजावी लागत असून, वैद्यकीय सर्वेक्षणांतूनही प्रदूषणामुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर ‘ग्रीन सिटी’सारख्या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची व्यापक चळवळ उभारणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
साईद्वारका सेवा ट्रस्ट आणि अहिल्यानगर महानगरपालिका यांच्या संयुक्त आयोजनाने ‘ग्रीन सिटी’ मोहिमेअंतर्गत एका वर्षात एक लाख वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते शहरातील माऊली सभागृह येथे झाला. यावेळी महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, तसेच महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, वाढती वाहतूक, वाहनांची वाढती संख्या, वेगाने उभ्या राहत असलेल्या वसाहती आणि पर्यावरणाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे शहरातील प्रदूषणात लक्षणीय वाढ होत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून, या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ‘ग्रीन सिटी’ हा उपक्रम या पार्श्वभूमीवर अत्यंत उपयुक्त ठरणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासात हरित क्षेत्राचा समतोल राखणे अत्यावश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, केवळ वृक्षलागवड करून थांबणे पुरेसे नाही, तर त्या वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. वृक्षलागवड कार्यक्रमापुरती मर्यादित न राहता ती कायमस्वरूपी व्हावी, यासाठी सर्वांनी जबाबदारीने पुढाकार घेणे आवश्यक आहे. प्रत्येक भागात ‘ग्रीन स्पेसेस’ विकसित करण्याबरोबरच शहराच्या रचनेत पर्यावरणपूरक बदल करणे ही सद्यकाळाची निकड आहे.
राज्यात जलसंपदा विभागामार्फत सुमारे पाच हजार एकर जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली असून, जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. नद्यांमधील वाढते प्रदूषण ही चिंतेची बाब असून, पाण्याच्या प्रदूषणावर नियंत्रणासाठी ठोस उपाय योजणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यावरण विषयक लोकशिक्षणाची चळवळ उभारणे अत्यावश्यक असून, त्यातून नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असेही ते म्हणाले. शहराचे नियोजन दीर्घकालीन दृष्टिकोनातून केले जात असून, आधुनिक व शाश्वत विकासाला प्राधान्य दिले जात आहे. शहर अधिक स्मार्ट बनविण्यासोबतच ‘क्लीन अँड ग्रीन सिटी’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी नमूद केले.
उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी प्रास्ताविकामध्ये ‘ग्रीन सिटी’ मोहिमेबाबत माहिती दिली. मोहिमेत सहभागी स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींचा पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



