देशस्तंभ ऑनलाइन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर , दि. 25 मार्च : वाहन चालविताना निष्काळजीपणा केल्याने झालेल्या अपघात प्रकरणी ट्रॅक्टर चालकास न्यायालयाने एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावत 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याबाबतची विस्तृत माहिती अशी की काशिनाथ तुकाराम पठारे (वय 45 राहणार डोंगरगण तालुका जिल्हा अहिल्यानगर ) हे ट्रॅक्टर चालवत असताना त्यांनी निष्काळजीपणे वेगात ट्रॅक्टर चालवून रस्त्यावरून जाणाऱ्या व्यक्तीस जोराची धडक दिली. यामध्ये वाहनाचे लाईट व इंडिकेटर योग्यरीत्या न वापरल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे निष्पन्न झाले. या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होऊन न्यायाधीश केजी पिंगळे यांनी आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 304 (अ) अंतर्गत एक वर्ष सक्षम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच इतर कलमान्वये स्वतंत्र शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची देखील शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्रमोद कुलकर्णी यांनी युक्तिवाद केला या प्रकरणाचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दीपक गांगर्डे यांनी केला तसेच एलपीजी गुंजाळ व एल पी एन ठोंबरे यांनी न्यायालयीन कामकाजात सहकार्य केले. या निकालामुळे निष्काळजी वाहन चालकांना इशारा मिळाला असून वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा