गुन्हेगारी

शहरातील वाढत्या चोरीप्रकरणांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही– आमदार संग्राम जगताप यांचा आरोप पोलीस अधीक्षकांना निवेदन ठोस कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

देशस्तंभ ऑनलाईन न्युज नेटवर्क : अहिल्यानगर (प्रतिनिधी)– शहरात वाढत चाललेल्या घरफोडी, वाहनचोरी आणि मंगळसूत्र हिसकावण्याच्या घटनांबाबत पोलिस प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप करत आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन दिले. यावेळी संपत बारस्कर, सुरेश बनसोडे, विपुल शेटीया, बाळासाहेब पवार, सुनील त्रिंबके, अभिजीत खोसे, नितीन घोडके, गणेश बारस्कर, दीपक खेडकर, सुमित कुलकर्णी, संतोष बोरा, गोपाळ मणियार, राजेंद्र बोथरा, अशोक भंडारी, संजय लोढा, दीपक नवलानी, रमेश दुल्लम, गिरीश खूपचंदानी, प्रतीक बोगावत, दीपक खंडेलवाल, यश तळरेजा, केतन मुथा आदीसह विविध सामाजिक कार्यकर्ते व व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. जगताप म्हणाले की, अहिल्यानगर परिसरात तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनेक घरफोडी व गाडी चोरीच्या घटना घडत असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरे फोडली जात आहेत, महिला व वृद्धांच्या गळ्यातील दागिने हिसकावले जात आहेत, तर घरासमोरील वाहनेही सुरक्षित नाहीत. अवघ्या दोन दिवसांत तीन चारचाकी वाहने चोरीस गेली आहेत. त्यात तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प पोलीस हद्दीतील घटना आहेत. एका भागात गाडी चोरीला गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागातही तशीच घटना घडणे म्हणजे पोलिसांची गस्त अपुरी आहे, असा आरोपही करण्यात आला.
शहराच्या मध्यवर्ती भागातील कपड्याच्या दुकानातही चोरी झाली असून चोरट्यांच्या हालचाली सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत. तरीही पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. अवैध धंद्यांना पोलिसांकडून मदत मिळते, असेही गंभीर आरोप या निवेदनात करण्यात आले असून. रात्री अपरात्री शहर चालू राहणे, गुन्हेगारांची वर्दळ वाढणे ही परिस्थिती धोकादायक बनत चालली आहे.
शहरातील नागरिक आता त्रस्त झाले असून, पोलिसांनी तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे