राजकिय

गोरगरीब कामगारांच लुबाडून खाणाऱ्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही – किरण काळे बायका पोरांसह रस्त्यावर उतरत कामगारांचा निघाला आक्रोश मोर्चा, व्यापाऱ्यांनाही दिला पाठिंबा

अहमदनगर दि. 15 डिसेंबर (प्रतिनिधी )
प्रतिनिधी : दोन वर्षांपासून रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगार बांधव कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसूलीसाठी टाहो फोडत आहेत. महसूल मंत्री जिल्ह्याचे सुपुत्र असून देखील महसूल विभाग, माथाडी मंडळ कामगारांच शोषण करत आहेत. कामगारांकडून काम करून घेऊन सुद्धा कामगारांचं वेतन द्यायची यांची नियत नाही. ही सरळ सरळ फसवणूक नाही तर काय. लक्षात ठेवा, गोरगरीब कामगारांच लुबाडून खाणाऱ्यांना देव नरकात सुद्धा जागा देणार नाही असा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. माथाडी कामगारांच्या बाजारपेठेतून बायका पोरांसह रस्त्यावर उतरत निघालेल्या आक्रोश मोर्चाच्या समारोप चौक सभेत ते बोलत होते.

माथाडी मंडळ २०२१ च्या आदेशाची अंमलबजावणी करून जानेवारी पासून सुधारित दराने वेतन अदा करा. पहिल्या टप्प्यातील थकीत वेतन तात्काळ कामगारांच्या खात्यात जमा करा. दुसऱ्या टप्प्यातील वेतन वसुली लवकरात लवकर पूर्ण करा. विळद धक्क्यावरील काम बंद करून पूर्वी प्रमाणेच नगर रेल्वे स्टेशन येथील एकत्रित काम चालू ठेवा. या मागण्यांसाठी कामगारांचा मोर्चा बाजारपेठेतून धडाडला. यावेळी माथाडी काँग्रेस विभाग जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभाग अध्यक्ष सुनील भिंगारदिवे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, संजय झिंजे, उषाताई भगत, सुनीता भाकरे, सोपानराव साळुंके, किशोर कोतकर, सोफियान रंगरेज, रोहीदास भालेराव, किशोर जपकर, अनिल जपकर, देवराम शिंदे, बाबासाहेब वैरागळ, जयराम आखाडे, गणपत वाघमारे, दीपक काकडे, सचिन लोंढे आदींसह कामगार मोठ्या संख्येने मोर्चात कुटुंबियांसह सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालत अभिवादन करून महाराजांची आरती करण्यात आली. त्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेंच्या पुतळ्यांना देखील अभिवादन करण्यात आले. आशा टॉकीज चौक, चौपाटी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक मार्गे कापड बाजार एमजी रोडच्या भिंगारवाला चौकात चौक सभेने मोर्चाचा समारोप झाला. कामगारांनी राज्य सरकार, महसूल विभाग, महसूल मंत्री, माथाडी मंडळ यांच्या निषेधाच्या घोषणा देत मोर्चा मार्ग दणाणून सोडला होता. ‘ दाम आमच्या कामाचं, नाही कुणाच्या बापाचं ‘, ‘ कोण म्हणतं देत नाय, घेतल्या शिवाय राहत नाय ‘ अशा घोषणा देत कामगारांनी आपल्या संतापाला यावेळी मोकळी वाट करून दिली. तसे निषेधाचे फलक कामगारांनी मोर्चात झळकवले.

काळे म्हणाले, राज्यातील खोके सरकार कामगारांच्या जीवावर उठले आहे. माथाडी कायदा देखील यांना मोडीत काढायचा आहे. सहाय्यक कामगार आयुक्त, जिल्हा महसूल प्रशासन हे कामगार, सर्वसामान्य जनतेसाठी काम करते की महसूलमंत्र्यांच्या खाजगी दावणीला बांधले आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर राज्यात अनेक महसूल मंत्री झाले. मात्र शहरासह जिल्ह्यातील हजारो गोरगरीब, कष्टकरी कामगारांना देशोधडीला लावणारा महसूल मंत्री महाराष्ट्रान पाहिला नव्हता. तो खोके सरकारमध्ये पाहण्याची वेळ दुर्दैवाने जिल्ह्यावर आली आहे. महसूल, माथाडी मंडळाने कामगारांचे कोट्यावधी रुपये ठेकेदारांना पाठीशी घालत थकवले आहेत. खासदार, आमदारांना देखील कामगारांच दुःख दूर करण्यासाठी वेळ नाही. खासदारांनी वाढदिवसाला शेकडो बोकड कापून तिखट खाऊ घालत कोट्यावधी रुपयांचा चुराडा केला. मात्र कामगारांची दिवाळी गोड होऊ दिली नाही.

विलास उबाळे म्हणाले, आक्रोश मोर्चात सहभागी होता येऊ नये यासाठी प्रशासनाने राजकीय दबावातून कामगारांवर दबाव आणला. त्यासाठी रात्र जागून काढली. कामगारांचे कैवारी म्हणून ज्या जिल्हा हमाल पंचायतच्या नावाखाली तथाकथित नेते म्हणून काही लोक बसतात त्यांनी पण कामगारांना मोर्चा जाऊ नका म्हणून दम भरला. कामगार थकित वेतन मिळवण्यासाठी दोन वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. तेव्हा हे झोपले होते का ? मोर्चा दडपण्याचा प्रयत्न करून त्यांची निष्ठा मूठभर ठेकेदारांपाशी आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे आता कामगारांना देखील खरे कोण खोटे कोण हे समजले आहे.

सुनील भिंगारदिवे म्हणाले, आम्ही घाम गाळतो. ओझी उचलतो. तेव्हा आमच्या लेकरा बाळांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही संध्याकाळी दोन पैसे घरी घेऊन जाऊ शकतो. आमच्या कडून ठेकेदारांनी फुकट काम करून घेतलं. कामगारांना लुटलं आणि त्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू आहे. कामगारांचा आक्रोश महसूलमंत्र्यांना ऐकू आला नाही आणि पुढील तीन आठवड्यांच्या आत मागण्या मान्य करत त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली नाही तर कामगार पुन्हा रस्त्यावर उतरत महसूलमंत्र्यांच्या कार्यालयावर अथवा निवासस्थानावर बोंबाबोंब करत अर्ध नग्न मोर्चा काढतील, असा जाहीर इशारा यावेळी कामगारांच्या वतीने त्यांनी दिला. मोर्चा विसर्जित झाल्यानंतर किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये शिष्टमंडळाने जाऊन जिल्हाधिकारी यांना तसेच त्यांच्यामार्फत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन सादर केले.

व्यापारी – कामगार भाई भाई :
कामगारांनी शहरातील चाळीस हजार दुकानदार, व्यापाऱ्यांच्या विरोधात अहमदनगर मनपाकडून प्रस्तावित असणाऱ्या व्यावसायिक परवाना शुल्क वसुलीला किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि विविध व्यापारी संघटना, असोसिएशनने उभ्या केलेल्या आंदोलनाला यावेळी पाठिंबा जाहीर केला. तसे लेखी पत्र व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी यांची एमजी रोड असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर, सचिव किरण व्होरा यांना चौकसभा स्थळी दिले. यावेळी व्यापाऱ्यांनी देखील कामगारांना त्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी पाठिंबा जाहीर करत लेखी पत्र दिले. या निमित्ताने पहिल्यांदाच ‘ व्यापारी – कामगार भाई – भाई ‘ असे चित्र पाहायला मिळाले. किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील या दोन्ही महत्त्वपूर्ण घटकांनी आगामी काळात लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे