लोकशाही राष्ट्रात धर्माच्या राष्ट्राची घोषणा म्हणजे आतंकी कृत्य -दीपकभाई केदार (पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष) अहमदनगरचे नाव बदलण्याऐवजी पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा धीरेंद्र बाणेश्वरचा निषेध

अहमदनगर दि. ३० जानेवारी (प्रतिनिधी)- हिंदू राष्ट्र निर्माणाची खुलेआम घोषणा करुन शपथ घेतल्या जात आहे. लोकशाही राष्ट्रात धर्माच्या राष्ट्राची घोषणा म्हणजे आतंकी कृत्य आहे. अशा कृत्याला सरकारचे समर्थन आहे. मतांच्या राजकारणासाठी लव्ह जिहाद संकल्पनेला जन्म घालण्यात आला. राम मंदिरचा मुद्दा संपल्यानंतर येणार्या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम दंगलीसाठी हा मुद्दा जन्माला घालण्यात आला आहे. त्यातून भडका उडवण्यासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चे काढले जात असल्याचा आरोप ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांनी केला.
ऑल इंडिया पँथर सेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यासाठी सोमवारी (दि.30 जानेवारी) शहरात आलेले केदार पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी पँथर सेनेचे राज्य अध्यक्ष विनोद भोळे, महासचिव सचिन तिवारी, राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडगे, सरचिटणीस जितेश जगताप, प्रवक्ता बंटीभाऊ सदाशिवे, महाराष्ट्र सचिव बापूसाहेब लष्करे, भीमराज गोटे, संघटक मीनाक्षी बोर्डे, जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, जिल्हा कार्याध्यक्ष पवन भिंगारदिवे, युवक जिल्हाध्यक्ष सागर ठोकळ, शहर जिल्हाध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके, उत्तर जिल्हाध्यक्ष राम दरोडे, कानिफ पोपळघट आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे केदार म्हणाले की, ऑल इंडिया पँथर सेना येणार्या सर्व निवडणुका लढविणार आहे. बौद्ध, आदिवासी, मुस्लिम, शोषित घटकांच्या सामाजिक स्वातंत्र्यासाठी राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी पँथर सेना मैदानात उतरली आहे. आठ वर्षात उभे राहिलेल्या हुकूमशाही धर्मसत्तेविरोधात देशभर निळा झेंडा हातात घेऊन, आंबेडकरवादी चळवळीने मानवता, बंधुत्व, समानता, न्याय, संविधान टिकवण्यासाठी हा लढा राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मोदी प्रणीत भाजप सरकारची अराजकतेची व्यवस्था उघडून फेकण्याची ताकद फक्त आंबेडकरवादी शक्तीमध्ये आहे. ही चळवळ राजकीय रित्या गतिमान करण्यासाठी निळा शक्ती व निळा झेंडा घेऊन रणशिंग फुंकण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रात दलित अत्याचाराने थैमान घातले आहे. अहमदनगर जिल्ह्यात सर्वात जास्त दलितांवर अत्याचार झालेला आहे. हा जिल्हा अत्याचारग्रस्त घोषित करावा व दलितांना संरक्षणासाठी शस्त्र परवाना देण्याची मागणी देखील त्यांनी केली. तर या मागणीसाठी देखील लढा देणार असल्याचे सांगितले. आंबेडकरी समूहाचे मुद्दे कोणाच्याही पटलावर नाहीत. गायरान जमीन, घरकुल, शिक्षण, शिष्यवृत्ती, नोकरीतील अनुशेष, दलित अत्याचार, आर्थिक नाकेबंदी, सामाजिक गुलामगिरी आजही जातीमुळे असतित्वात आहे. या समाजाला फक्त निवडणुकीत सन्मान दिला जातो. यासाठी राजकीय सत्तेमध्ये जाणे गरजेचे आहे. समाजाच्या कल्याणासाठी व शोषणमुक्तीसाठी निवडणुकीतून निळी शक्तीची ताकद दाखविणार असल्याचेही ते म्हंटले. युतीवर बोलताना त्यांनी भीक न मागता सन्मानाने बोलावल्यास युती केली जाणार असल्याचेही स्पष्ट केले.
अहमदनगरचे नामांतर होऊ देणार नाही. आमचा नामांतराला विरोध आहे. अहमदनगरला मुस्लिम विरोधी नजरेतून बघू नका. गोपीचंद पडळकर यांना पुढे करुन नामांतर हा आरएसएसचा मुद्दा आहे. धनगर समाजाची भटकंती थांबविण्यासाठी त्यांना आर्थिक, सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी पडळकर यांनी भाजपच्या सत्तेचा वापर करावा. राजकारणासाठी माता अहिल्याबाई होळकरांचा वापर करू नये. अहमदनगरची स्थापना अहमदशहाने केली आहे. शहराचे नाव अहमद आहे म्हणून विरोध होत असेल तर, पहिले गुजरातमधील अहमदाबादचे नाव बदलावे. तसेच मध्यप्रदेशातील इंदूरला अहिल्याबाई होळकरांचे नाव द्यावे व इंदूरचा राजवाड्यास राष्ट्रीय स्मारक घोषित करुन भव्य स्वरुपात अहिल्याबाई यांच्या मुर्तीची उभारणी करण्याची मागणी देखील केदार यांनी केली. तर शहरांच्या नामांतराचे भांडणे लावायचे आणि महाराष्ट्रात आलेले उद्योग कंपन्या इतर ठिकणी पळवायच्या हे भाजपचे कारस्थान असल्याच आरोप त्यांनी केला.
संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा धीरेंद्र बाणेश्वर हा ठगेश्वर असल्याचा घणघाती आरोप केदार यांनी केला. ते मानसिक रोगी आहे. सनातनी प्रवृत्तीतून त्यांनी मानवतावादी संत तुकाराम महाराज यांच्यावर टीका केली असल्याचे त्यांनी सांगितले. या वक्तव्याचा निषेध करुन ही प्रवृत्ती ठेचून काढण्याचा इशारा त्यांनी दिला.