साठ वर्षांपूर्वीची मयत व्यक्ती जिवंत दाखवत बनावट कागदपत्राद्वारे जमीन हडपण्याचा प्रयत्न

कर्जत (प्रतिनिधी) : दि २२ जून
साठ वर्षांपूर्वी मयत झालेल्या व्यक्तीला जिवंत दाखवून त्याचे बनावट मृत्यूपत्र तयार करून त्याची पूर्वी विकलेली जमीन नव्याने विक्री करत फसवणूक करण्यात आली असल्याचा आरोप करत तळवडी येथील देवराव केशव तुरकुंडे यांनी केला. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करीत दोन व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील तळवडी येथील नाना कान्हू भोसले हे १९६० पूर्वी मयत झाले असून त्याची एकमेव वारस मुलगी वैजंता बाबू गायकवाड हिची १३ नोव्हे १९६० रोजी वारस नोंद लावताना नाना कान्हू मयत असा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ नाना कान्हू हे त्यापूर्वीच मयत झाले असल्याचे सिद्ध होते. त्यानंतर वैजंता बाबू गायकवाड
हिने वारसाने मिळालेली जमीन देवराव केशव तुरकुंडे यांना २३ फेब्रु १९६८ रोजी खरेदीखताने विकली. त्याची नोंद ही गावच्या रेकॉर्डला झालेली आहे. तेव्हा पासून आज पर्यत ही जमीन देवराव केशव तुरकुंडे यांच्या ताब्यात असताना सदर जमीन बनावट कागदपत्रे करून प्रशासनाला हाताशी धरून विकण्यात आली असल्याचे निदर्शनास आले.
मात्र १९६० पूर्वी मयत झालेल्या नाना कान्हू भोसले यांना जिवंत दाखवून दि ३ जुलै २०२० रोजी हर्षल अशोक पाटील यांनी बोगस कागदपत्रे तयार करून मेलेल्या व्यक्तीस जिवंत दाखवत दुय्यम निबंधक कार्यलयासमोर उभे करून त्याचे मृत्यूपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर ३ डिसें २०२० रोजी सदर नाना कान्हू भोसले मृत्यू पावल्याचे बनावट मृत्युपत्राच्या आधारे जुना सर्व्हे नं २० नवीन गट नंबर ६४ ही जमीन गावकामगार तलाठी महादेव ढगे यांना हाताशी धरून बोगस नोंद घेऊन हर्षल अशोक पाटील याने आपल्या नावावर करून घेतली. यानंतर ७ सप्टेंबर २०२१ रोजी हर्षल पाटील रा पुणे याने ही जमीन तळवडी येथील अशोक मोहन तुरकुंडे यांस विकली.
सदर प्रकरणात साठ वर्षांपूर्वी मयत व्यक्तीला जिवंत दाखवत बनावट व्यक्ती, त्याचे बनावट मतदान ओळखपत्र यासह मृत्युपत्र, बनावट मृत्यूचा दाखला द्वारे जमीन बळकावन्याचा व ती विकून फसवणूक केली असल्याचा आरोप देवराव केशव तुरकुंडे यांनी केला. या प्रकरणी सदर जमीन १९६८ पासून आपल्या ताब्यात असून ती कसत आहोत त्यामुळे याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात हर्षल पाटील (रा पुणे व तळवडी) आणि अशोक मोहन तुरकुंडे यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली असून या दोघा विरोधात ४२०, ४६७, ४६८, ४७१, सह ३४ प्रमाणे दि ८ ऑक्टो २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील आरोपींचा कर्जत पोलीसानी तात्काळ शोध घेत तपास करावा अशी मागणी तुरकुंडे कुटुंबीयांनी केली आहे.