७० % कमिशन खाता म्हणूनच रस्ते गुणवत्ता पडताळणी मोहिमेला त्यांची शतप्रतिशत दांडी – किरण काळे नगरला खड्ड्यात घालणाऱ्यांना जनता कदापि माफ करणार नाहीत : किरण काळे भर उन्हात छत्र्या घेऊन कार्यकर्त्यांचा छ.संभाजीमहाराज पुतळा स्थळाजवळ ठिय्या!

अहमदनगर दि. १९ मे (प्रतिनिधी) : काँग्रेसने रस्ते घोटाळ्यावरून रान उठवले आहे. बनावट टेस्ट रिपोर्ट, थर्ड पार्टी रिपोर्ट प्रकरणावरून शहरातील रस्त्यांची गुणवत्ता पडताळणी इन कॅमेरा करण्याच्या मोहिमेला निमंत्रण देऊनही आयुक्त, आमदार, शहर अभियंता, पडताळणी करणारी त्रयस्त यंत्रणा या सगळ्यांनीच शतप्रतिशत दांडी मारली आहे. विशेष म्हणजे ६८ नगरसेवक असणाऱ्या महापालिकेतील मनपा पदाधिकारी, तसेच एकाही नगरसेवकाने यावेळी या अग्निपरीक्षेला सामोरं जाण्याची हिम्मत दाखवली नाही. ७० % कमिशन खात कोट्यावधींचा भ्रष्टाचार करुन नगरला खड्ड्यात घालणाऱ्या घोटाळेबाजांना नगरकर कदापि माफ करणार नाहीत, असा घाणाघात यावेळी बोलताना शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केला आहे.
शहर काँग्रेसने जाहीर आव्हान दिले होते. सा.बां.विभागाच्या फिरत्या लॅबसह सरप्राईज भेट देत किमान दहा रस्त्यांची नागरिकांसमवेत संयुक्तरित्या इन कॅमेरा कामांचा दर्जा तपासण्यासाठी शुक्रवारी विशेष मोहिमेचे आयोजन केले होते. यासाठीची शासकीय फी कार्यकर्त्यांनी वर्गणी करून भरण्याची तयारी दाखवली होती. दरम्यान, स्वराज्यरक्षक छ. संभाजीमहाराजांच्या नियोजित पुतळा स्थळाजवळ दुपारच्या भर उन्हात काँग्रेस कार्यकर्त्यांना छात्र्यांचा आधार घेत ठिय्या मारावा लागला. ३८ डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान असून यावेळी उन्हाच्या झळा कार्यकर्त्यांना लागत होत्या. आम्ही पाच मांडवाल्यांना मांडव लावा म्हणून विनंती केली. रात्रीच मांडव लावतो असं म्हणणारे मांडववाले मात्र कार्यक्रमाचा तपशील ऐकला की, माणसं नाहीत अशी कारणं पुढे करायला लागली. घोटाळेबहद्दरांची शहरात दहशत असल्यामुळे लोक भयभीत असल्याचा आरोप, यावेळी काळे यांनी केला.
शहरातील रस्ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे दर्जा तपासण्याची भ्रष्टाचाऱ्यांमध्ये हिम्मत नाही. म्हणूनच त्यांनी पळ काढला आहे. मनपा अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना हाताशी धरत राजकीय संगनमतातून जनतेच्या पैशांची लूट केली आहे. लोकप्रतिनिधी, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांनी चांगले रस्ते करून घेणे त्यांची जबाबदारी असताना हेच टक्केवारी खाण्यात मश्गूल आहेत. रस्त्याच्या कामांचे उद्घाटन करतेवेळी फोटोसेशन करता. मग त्याच रस्त्यांना चार महिन्यात खड्डे पडल्यावर त्या खड्ड्यांमध्ये उभे राहून देखील फोटोसेशन करा, असा टोला काळेंनी लगावला आहे.
## जनताच तुम्हाला कायमचे पिटाळून लावेल :
आयुक्तांना लेखी पत्र दिले होते. गुरुवारी संध्याकाळी फोन ही केला. त्यांनी उचलला नाही. त्यांच्या स्वीय सहाय्यकांना आयुक्तांना आठवण करून देण्यास सांगितले. आमदारांना जाहीर आवाहन, ईमेल, व्हाट्सअपद्वारे लेखी पत्र दिले. त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाही फोन केला. नगरसेवकांना ही जाहीर आवाहन केले. मनपामार्फत निमंत्रण दिले. मात्र जनतेच्या दरबारात न येता या सर्वांनीच पळ काढला. आज तुम्ही पळ काढताय. थोडं थांबा. योग्य वेळी जनताच तुम्हाला नाकारत कायमचे पिटाळून लावेल, असे काळे म्हणाले.
## शनिवारी शासकीय तंत्रनिकेतनसमोर आंदोलन :
अहमदनगर शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट दस्तऐवज तयार केल्याचे समोर आले आहे. शासकीय आस्थापनेच्या नावाने अशी बनावट कागदपत्र तयार करणे हा गंभीर गुन्हा आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी प्राचार्यांची किरण काळेंच्या नेतृत्वाखाली शनिवारी भेट घेत निवेदन देवून आंदोलन करणार असल्याचे यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचांनी जाहीर केले.
## मीडियाचे मानले आभार :
मीडिया लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. रस्ता घोटाळा प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. काँग्रेस जनहितार्थ याविषयी आवाज उठवत आहे. मीडिया या घोटाळा प्रकरणाला प्रसिद्धी देत असल्यामुळेच आज शहरातील घराघरात जनतेच्या पैशांची लूट कशी झाली हे पोहोचत आहे. प्रभागा, प्रभागात नागरिक नगरसेवकांना जाब विचारू लागले आहेत. काँग्रेसच्या या लढाईला जनआंदोलनाचे स्वरूप जनता देत आहे. मी मीडियाचे यासाठी नगरकरांच्यावतीने जाहीर आभार मानतो असे यावेळी किरण काळे म्हणाले.
युवक काँग्रेस कार्यकर्त्याला आली भोवळ :
उन्हाचा पारा 38 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त होता. यामुळे युवक काँग्रेस कार्यकर्ता प्रणव मकासरे याला अचानक भोवळ आली. यावेळी कार्यकर्त्यांनी मकासरे याला तात्काळ रिक्षाने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काँग्रेस कार्यकर्ते उन्हामध्ये नागरिकांसाठी आवाज उठवत आहेत. मात्र अधिकारी, लोकप्रतिनिधी एसीमध्ये बसून आहेत. जनतेच्या वतीने यावेळी किरण काळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, राणीताई पंडित, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, आकाश अल्हाट, प्रणव मकासरे, सोफियान रंगरेज, किशोर कांबळे, अजय मिसाळ, आरिफ शेख, फिरोज शेख आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते