ब्रेकिंग

जातपंचायतीचा अघोरी प्रताप! १० लाखांची खंडणी नाकारल्याने कुटुंबाला समाजातून केले बहिष्कृत; पीडित महिलेची पोलीस अधीक्षकांकडे धाव

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 29 मे : (प्रतिनिधी):-नाथपंथी डवरी गोसावी समाजातील जातपंचायतीने एका गरीब कुटुंबाला समाजातून बेदखल (बहिष्कृत) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी पीडित महिला परिघाबाई विलास सावंत यांनी अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे धाव घेऊन दोषी पंचांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.पैसे न दिल्यास जीवितास धोका असल्याचा खळबळजनक आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.अर्जदार परिघाबाई विलास सावंत (रा.सोनई, ता. नेवासा,जि.अहिल्यानगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांचा मुलगा प्रकाश विलास सावंत याचा विवाह २०१८ मध्ये नामदेव भगवान शिंदे (रा.ढवळगाव,ता. श्रीगोंदा) यांच्या मुलीशी झाला होता.२०२४ पर्यंत सर्व काही सुरळीत सुरू होते.मात्र,एका दिवशी सुनेने माहेरी जाण्याची इच्छा व्यक्त केल्याने पती प्रकाश सावंत याने तिला शिंगणापूर फाटा येथून श्रीगोंदा येथील ढवळगावला जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसवून दिले.सायंकाळी सासरच्या लोकांना चौकशी केली असता मुलगी घरी पोहोचली नसल्याचे समजले.सर्व नातेवाईकांकडे शोध घेऊनही सून न सापडल्याने अखेर दि. १६/०५/२०२६ रोजी सोनई पोलीस ठाण्यात ती हरवल्याची (मिसिंग) तक्रार दाखल करण्यात आली.मात्र काही दिवसांनंतर सदर सुनेने दुसरे लग्न केल्याचे उघड झाले व तिच्या नवीन पतीने तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले.सून पळून गेल्याची ही बाब समाजातील पंचांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने पंच बाबुराव नाना शिंदे,भगवान उत्तम शिंदे,साहेबराव बाबुराव सावंत,भीमराव माणिक आहेर,
नवनाथ बापू शिंदे,भीमराव दादा चव्हाण,दादाराव पंढरीनाथ आहेर (सर्व राहणार:तालुका करमाळा,जिल्हा सोलापूर)
या पंचांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आणि जातपंचायतीला देण्यासाठी तब्बल १० लाख रुपयांची मागणी केली.सावंत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांनी एवढी मोठी रक्कम देण्यास असमर्थता दर्शवली.पैसे न दिल्याचा राग मनात धरून या पंचांनी संपूर्ण सावंत कुटुंबाला समाजातून बेदखल (बहिष्कृत) केले.समाजातून बहिष्कृत केल्यामुळे सावंत कुटुंबातील मुला-मुलींची लग्ने जमवण्यात अडचणी येऊ लागल्या आणि त्यांच्यावर सामाजिक अन्याय सुरू झाला.यामुळे हताश झालेल्या कुटुंबाने पुन्हा एकदा प्रयत्न केला.दि.१५/०५/२०२६ रोजी श्रीगोंदा तालुक्यातील डोकराई येथे समाजातील इतर पंच रूपचंद दत्ता सावंत,प्रकाश उर्फ खन्ना सावंत,भगवान शंकर शिंदे,मोहन बहिरू बाबर,दत्ता अंकुश शिंदे,यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेण्यात आली.मात्र, या बैठकीतही जुन्याच पंचांच्या सुरात सूर मिसळत पुन्हा १० लाख रुपयांचीच मागणी करण्यात आली. तसेच “पैसे न दिल्यास तुम्ही कायमस्वरूपी समाजातून बेदखल राहाल” अशी धमकी देऊन कुटुंबाची घोर निराशा करण्यात आली.”जातपंचायतीने समाजातून बहिष्कृत केल्यामुळे समाजात जगायचे कसे,असा गंभीर प्रश्न आमच्यासमोर उभा राहिला आहे.वरील सर्व पंचांकडून माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवितास मोठा धोका आहे,” अशी भीती परिघाबाई सावंत आणि प्रकाश विलास सावंत यांनी व्यक्त केली आहे.
या अघोरी जातपंचायतीच्या जाचाविरुद्ध आणि खंडणीखोर पंचांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करावी व आम्हाला न्याय मिळवून द्यावा,अशी आर्त हाक पीडित कुटुंबाने दि. २९/०५/२०२६ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पोलीस प्रशासन आता यावर काय कारवाई करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे