देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 23 मे, (प्रतिनिधी)- शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १७ व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाच्या “स्व. अरुणकाका साहित्य नगरी”चे उद्घाटन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तथा कृषी मंत्री दत्तात्रय विठ्ठल उर्फ दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते या साहित्य नगरीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी आमदार संग्रामभैय्या जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, स्थायी समिती सभापती सुभाष लोंढे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, संपतदादा बारस्कर, कुमार वाकळे, गणेश भोसले, महेश लोंढे, प्रकाश भागानगरे, मोहित पंजाबी, प्रा. डॉ. संदीप सांगळे, डॉ. संजीवनीताई तडेगावकर, प्रा. डी. आर. जाधव, प्रा. विलास साठे, प्रा. बी. एल जाधव, प्रा.संजय घोडके, प्रा. हनुमंत गायकवाड, संपादक महेश भोसले, संपादक संदीप शिंदे, आरपीआयचे युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे,यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाहिरी जलसा कार्यक्रमाने संमेलनाला विशेष रंगत आणली. शाहीर कल्याण काळे, भारुड सम्राट हमीद सय्यद, शाहीर भारत गाडेकर, वसंत डंबाळे, डॉ. शेषराव पठाडे, प्रशांत सूर्यवंशी, दिगंबर गोंधळी आणि हौसीनाथ बोर्डे आदी कलाकारांनी आपल्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांची दाद मिळवली.
स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी प्रस्ताविकातून संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री दत्ता मामा भरणे म्हणाले की,
“राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनामुळे नव्या पिढीत वाचनाची आवड निर्माण होणार आहे. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश आजच्या युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वाचनामुळे विचार समृद्ध होतात, चुकीच्या प्रवृत्तींपासून दूर राहता येते आणि जीवनाला सकारात्मक दिशा मिळते.”
ते पुढे म्हणाले, “जीवनात घडण्यासाठी प्रत्येकाला कष्ट आणि चिकाटी आवश्यक असते. कोणाकडेही जादूची कांडी नसते. मी कृषी मंत्री झालो असलो तरी शेवटी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. साहित्य संमेलन ही केवळ गर्दी नसून विचारवंतांची मेजवानी असते. येथे विचारांची देवाणघेवाण होते आणि समाजात वैचारिक संस्कार घडतात.”
या संमेलनात प्रा. डॉ. गणी पटेल आणि आयु. अशोकराव गायकवाड यांना “शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
संमेलनादरम्यान विविध विषयांवरील परिसंवाद, काव्य संमेलन, गझल मैफल, चर्चासत्रे तसेच पुस्तक प्रकाशनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. “आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण”, “बदलते ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती” तसेच “असा मी घडलो…” यांसारख्या विषयांवर मान्यवर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत.
रविवारी होणाऱ्या समारोप कार्यक्रमास पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण उपस्थित राहणार असून, विविध साहित्य पुरस्कारांचे वितरण आणि “शब्दसंचित” ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
साहित्यिक, कवी, लेखक आणि साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संमेलनाचा लाभ घ्यावा,
असे आवाहन स्वागताध्यक्ष सुरेश बनसोडे, शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे आणि संयोजन समितीच्या सदस्यांनी केले आहे. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंकुश मोहिते, पप्पू पाटील, येशूदास वाघमारे, ऋषी विधाते, सतीश साळवे, याकूब वडागळे, दिपक सरोदे आदींनी परिश्रम घेतले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा