देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर -दि. 3 मे :बस प्रवासादरम्यान चोरी गेलेल्या तब्बल २२ तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गुन्हा उघडकीस आणत कोतवाली पोलिसांनी तात्काळ व प्रभावी कारवाई करत चोरीचा तपास पूर्ण केला आणि २० तोळे सोने २५ लाखाचे जप्त करण्यात यश मिळवले. या कामगिरीबद्दल पोलिसांचे कौतुक होत असतानाच, चोरीचे सोने विकत घेणाऱ्या सराफावर देखील कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा तालुक्यातील करजगाव येथील मिनाबाई ज्ञानदेव बडाख यांनी दिलेल्या निवेदनानुसार, ७ एप्रिल २०२६ रोजी त्या पुणे–पाथर्डी एसटी बसने अहिल्यानगरकडे प्रवास करत होत्या. शिरूर (जि. पुणे) येथे दोन अनोळखी महिला बसमध्ये चढल्या. त्यापैकी एक महिला त्यांच्या शेजारी येऊन बसली. काही वेळाने झोप लागल्यानंतर त्या महिलांनी संधी साधून बडाख यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने चोरून नेले.
अहिल्यानगर बसस्थानकावर उतरल्यावर हा प्रकार लक्षात येताच बडाख यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्परतेने तपास करत माया कल्याण भोसले (रा. हादगाव, ता. शेवगाव) हिला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तिने गुन्ह्याची कबुली देत चोरीचे सोने बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत मधुकर आदापुरे याला विकल्याचे सांगितले.
यानंतर पोलिसांनी संबंधित सराफाकडून कायदेशीर पंचनामा करून चोरीचे सर्व सोने जप्त केले. त्यामुळे पीडित महिलेला दिलासा मिळाला आहे.
मात्र, या प्रकरणात चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सराफावर अद्याप गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे.
“चोरांकडून सराफांनी सोने खरेदी करणे थांबवले, तर अशा प्रकारच्या चोरीच्या घटना कमी होतील,” असे मतही नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
मिनाबाई बडाख यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनात सराफ भागवत आदापुरे यांना देखील या गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे, व अशा सराफांना पाठीशी घालणाऱ्या सराफ संघटनेच्या पदाधिकारी यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, कोतवाली पोलिसांच्या जलद आणि निष्पक्ष तपासामुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असला, तरी या प्रकरणातील चोरीचे सोने घेणारे सराफ यांच्या बाजूने सुवर्णकार समितीचे पदाधिकारी उमेश बुऱ्हाडे यांनी उलट कोतवाली पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी करत मागील काही दिवसापासून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर उपोषण सुरू केलेले आहे. त्या अनुषंगाने उमेश बोराडे व त्यांचे पदाधिकारी यांच्या विषयी माहिती घेता, हे लोक सातत्याने ज्या ज्या ठिकाणी पोलीस अशा चोरीचे सोने घेणाऱ्या सराफांकडून सोने जप्तीची कारवाई करीत असतात, अशावेळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक प्रवेश करून संबंधित सराफ यांना चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करून व वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करून संबंधित सराफांनी सोने जप्ती देऊ नये म्हणून प्रयत्न करत असतात, अशा स्वरूपाची प्रेस नोट देखील सातारा पोलिसांनी यापूर्वीच प्रसिद्ध केलेली आहे. तसेच वालचंदनगर पोलिस स्टेशन येथे पण कायदेशीर प्रक्रियेने चोरीचे सोने तेथील पोलिसांनी हस्तगत केले असता सदर ठिकाणी जाऊन पोलिसांचा कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केले बाबत नोंदी आहेत.याशिवाय सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि इतर विविध ठिकाणी उमेश बोराडे व त्याचे साथीदार यांनी सोने जप्तीला चुकीच्या पद्धतीने विरोध करण्याचा पायंडा पाडला आहे.
वास्तविक पाहता माननीय पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी पोलीस व सुवर्णकार यांच्यामध्ये सुसंवाद असावा आणि सोने जप्तीची कारवाई सुलभ व्हावी, याकरिता संपूर्ण महाराष्ट्रात कार्यालयीन आदेश काढून त्यामध्ये सुवर्णकार दक्षता समिती सदस्य म्हणून प्रतिष्ठित अशा सुवर्णकार बांधवांची नियुक्ती केलेली आहे. त्यामध्ये संबंधित उमेश बोराडे किंवा त्यांचे इतर साथीदार यांची व त्यांच्या संघटनेची कोणतीही नोंद नाही. असे असताना देखील कोणत्यातरी विशिष्ट हेतूने उमेश बोराडे अशा प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक प्रवेश करून चुकीच्या पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. त्यामुळे इतर सुवर्णकार बांधवांनी याबाबत सखोल माहिती घ्यावी आणि केवळ उमेश बोराडे ज्या पद्धतीने निवेदन करत आहेत,केवळ त्यावर विश्वास ठेवून कोणतेही पाऊल उचलू नये. अशा प्रकारच्या चर्चा अहिल्यानगरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये होत आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा