देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर, दि.८- गावांच्या दळणवळणाच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण करावीत. ही विकास कामे होत असताना गावकऱ्यांनी जबाबदारीने या कामांकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी विविध रस्ते विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
कर्जत तालुक्यातील मौजे दिघी येथे राष्ट्रीय मार्ग-८ ते जिल्हा हद्द साखळी या ८३ लक्ष ६२ हजार रुपये किंमतीच्या रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ, कापरेवाडी येथे प्रजिमा ११५ ते कापरेवाडी रस्ता या १ कोटी २३ लक्ष रुपये किंमतीच्या, शेगुड ते शेगुडवस्ती या २ कोटी ५६ लक्ष रुपये आणि राष्ट्रीय महामार्ग ६७(कोरेगाव फाटा) ते कोरेगाव रस्ता या २ कोटी ९४ लक्ष रुपये किंमतीच्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. दिघी येथील महादेव मंदिराच्या सभामंडपाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास प्रविण घुले, अशोक खेडकर, प्रकाश शिंदे, कैलास अण्णा शेवाळे, अनिल गदादे, सुनिल यादव, गटविकास अधिकारी रुपचंद जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक अभियंता सुनिल सौताडे, दादासाहेब सोनवणे, अनिल खराडे उपस्थित होते.
प्रा.राम शिंदे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये विकास कामे झाली पाहिजेत. ही कामे होत असताना ती दर्जेदार व गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत. ग्रामीण भागात अधिकाधिक विकास कामे होऊन गावांचा व ग्रामस्थांचा विकास होण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
कार्यक्रमास ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा