प्रशासकिय

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविणार – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. ११ जानेवारी (प्रतिनिधी ):- ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे मार्गदर्शक घटक आहेत. शासनाच्या योजनांच्या माध्यमातुन ज्येष्ठ नागरिकांचे जीवन अधिक सुखकर करण्याबरोबरच त्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त राधाकीसन देवढे, ज्येष्ठ नागरिक प्रादेशिक विभाग, अहमदनगरचे अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर, जिल्हा ज्येष्ठ नागरिक सल्लागार अशोक आगरकर, कार्याध्यक्ष के.डी. खानदेशे, सदस्य खोसेराव शितोळे, डॉ. जी.पी. शेख, डॉ.प्रितम बेदरकर, डॉ. अंजली धोंडे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, आई-वडिल आयुष्यभर काबाडकष्ट करून आपल्या पाल्यांना शिक्षण, प्रेम, माया देतात.समाजामध्ये आपल्या पायावर उभे राहून मानाने जगण्याइतपत बळ त्यांच्यात निर्माण करतात. परंतु याच आई- वडिलांना त्यांच्या उतारवयात वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते. आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या या पाल्यांच्या जीवनाला कुठलाच अर्थ नसल्याचे सांगत आपल्या आई- वडिलांचा सांभाळ करणे हे प्रत्येक मुला-मुलीचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. तसेच कायद्याचीही निर्मितीही केली आहे. ज्येष्ठांना सन्मानाने जगता यावे यासाठी जिल्ह्यात योजनांची व कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी अहमदनगर शहरात विरंगुळा केंद्र उभारण्याबरोबरच जिल्ह्यातील प्रत्येक गावात ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करण्यासाठी संघटनांना प्रशासनामार्फत सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सहायक आयुक्त श्री देवढे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत अनेकविध योजना राबविण्यात येतात. ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच त्यांना आवश्यक ती मदत करण्यासाठी विभागामार्फत समन्वय साधण्यात येतो. वृद्धांची हेळसांड थांबून त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी शासनामार्फत वृद्धाश्रम सुरू करण्यास परवानगी देण्याबरोबरच अनुदानही देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विषयक व ताणतणावमुक्त जीवन या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे