अक्षय ऊर्जा स्रोत ही भविष्य काळाची गरज -प्रा. डॉ. शेषराव पवार

पाथर्डी दि.१६ (प्रतिनिधी वजीर शेख)
भविष्य काळामध्ये लागणारे ऊर्जा स्रोत हे आपणासमोर एक आव्हान आहे .कारण पेट्रोल, डिझेल तेल इत्यादी गोष्टींचा अतिरेकी वापर होत असल्याने त्यांचे साठे लवकरच संपुष्टात येणार आहेत . त्यामुळे अक्षय ऊर्जा स्रोत वापर करणे ही काळाची गरज आहे .शाश्वत ऊर्जा स्रोत हे आपणा समोर एक नवीन क्षेत्र खुले होत आहे. त्यासाठी सौर उर्जेवर चालणाऱ्या गाड्या, सौर उर्जेवर घरगुती वापरासाठी लागणारी वीज ,सोलर हिटर इत्यादी गोष्टींचा जास्त प्रमाणात प्रसार होण्याची आवश्यकता आहे ,असे प्रतिपादन डॉ. शेषराव पवार यांनी श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी यांनी एक दिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळेत केले.
विद्यार्थी कल्याण मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व श्री आनंद महाविद्यालय पाथर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय कार्यशाळा “अपकमिंग ट्रेंड्स इन रिन्यूएबल एनर्जी सोर्सेस” या विषयावर दिनांक १५ मार्च रोजी आयोजित करण्यात आली.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर पवार सर यांनी भविष्यात उपलब्ध असणारे शाश्वत ऊर्जा स्रोत याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
कार्यशाळेच्या प्रथम सत्रामध्ये डॉक्टर रमेश खराडे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर यांनी सोलर एनर्जी डिव्हाइसेस या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .सौर ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्मिती कशी केली जाते. व ती कशी साठवली जाते ,त्याचे फायदे व तोटे यावर विवेचन केले.
कार्यशाळेच्या द्वितीय सत्रा मध्ये डॉ. अशोक जाधवर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर यांनी सोलर थर्मल डिव्हाइसेस यावर मार्गदर्शन केले .त्यांनी सोलर हिटर चे विविध प्रकार ,सोलर कुकर यांचे कार्य कसे चालते. यावर मार्गदर्शन केले .तसेच सोलर हिटर ,सोलर कुकर यांची सचित्र माहिती दिली. विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे त्यांनी निरसन केले.
कार्यशाळेच्या तृतीय सत्रामध्ये प्राध्यापक अजित पालवे बाबूजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी यांनी शेतीसाठी सौर ऊर्जा वर चालणारे पंप यावर मार्गदर्शन केले . शासन शेतकऱ्यांना सौर पंप खरेदी करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत आहे व खरेदी करण्यासाठी अनुदान पण देत आहे ,याविषयीचे सखोल मार्गदर्शन प्राध्यापक पालवे सर यांनी विद्यार्थ्यांना केले. भविष्यकाळात वीज टंचाईचे अस्मानी संकट सर्वांसमोर आहे .त्यामुळे सौरऊर्जेला पर्याय नाही .शेतकऱ्यांसाठी सौर पंप अत्यंत उपयुक्त ठरत आहेत ,म्हणून प्रत्येकाने या अक्षय ऊर्जेचा वापर वाढवला पाहिजे.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉक्टर जगन्नाथ बर्शीले अध्यक्ष विद्यार्थी कल्याण मंडळ यांनी केले. प्राध्यापक सूर्यकांत काळोखे यांनी सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापिका अनिता पावसे यांनी केले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक अजिंक्य भोर्डे ,डॉक्टर नितीन ढुमणे ,डॉक्टर विकास गाडे यांनी प्रयत्न केले. महाविद्यालयातील प्राध्यापक अरुण बोरुडे ,डॉक्टर अनिल गंभीरे ,डॉक्टर प्रतिक नागवडे डॉक्टर धीरज भावसार , विविध महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते.