देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, दि. 23 एप्रिल : शहरातील कायनेटिक चौक (नगर–पुणे रोड परिसर) येथे दररोज दुपार व संध्याकाळच्या वेळेस तीव्र ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होत असून, सदर परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. या ठिकाणी वाहतूक शाखेकडून कोणतेही प्रभावी नियोजन किंवा नियंत्रण नसल्यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या चौकात यापूर्वी अनेक गंभीर व जीवघेणे अपघात घडलेले असून, निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पुण्याकडून येणारी वेगवान वाहने तसेच दौंड रोडकडून येणारे जड व्यावसायिक ट्रक यामुळे या परिसरातील वाहतूक अत्यंत धोकादायक बनली आहे. परिणामी, ये-जा करणारे नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुले यांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
सदर परिस्थितीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. उद्या पुन्हा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, याची नोंद घ्यावी.
म्हणून आपणास नम्र पण ठाम विनंती करण्यात येते की, या अत्यंत गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन पुढील उपाययोजना त्वरित राबविण्यात याव्यात:
• सदर चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसविणे
• वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नियुक्ती करणे
• वेग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना (स्पीड ब्रेकर, संकेतचिन्हे इ.) करणे
तसेच, या समस्येचे दीर्घकालीन व परिणामकारक निराकरण करण्यासाठी हायवे प्राधिकरण, महानगरपालिका (मनपा) व सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांच्या संयुक्त सहकार्याने योग्य नियोजन करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, ही अपेक्षा आहे.
अन्यथा, स्थानिक नागरिकांना पुढील काळात आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, याची नोंद घ्यावी, असा ईशारा महानगर पालिकेचे नगरसेवक मयूर बांगरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा