संविधानातील मूलभूत मूल्यांचे राजकीय अवमूल्यन हेच लोकशाही पुढील प्रमुख आव्हान: प्रा.देवढे
लोकशाही उत्सवास सुरुवात!

अहमदनगर (प्रतिनिधी) देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारताच्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. जातवर्ग संघर्ष वाढत आहे, धर्मांधतेला खतपाणी घातले जात आहे, तरुणांच्या हाताला काम नाही, स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत. अशा विषम परिस्थितीतून लोकशाही जात आहे. देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्षता सांगत असताना धर्माधिष्ठित राजकारण सुरू आहे. राजकीय व व्यावहारिक पातळीवर अनेक अंगाने लोकशाहीला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. अशा वेळी समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यास कटिबद्ध असलेली लोकशाही हीच लोककल्याणकारी राज्य निर्माण करू शकते. त्यामुळे भारतीय लोकशाहीचे संवर्धन तर झालेच पाहिजे, पण ती तळागाळापर्यंत शिक्षित नागरिकाने पोहोचवली पाहिजे. लोकशाही उत्सव आयोजित करणे हे लोकशाही बळकट करण्याच्या दिशेने पडलेले पाऊल आहे, या उत्सवात भारतीय नागरिकांनी जाणीवपूर्वक सहभागी झाले पाहिजे, असे आवाहन प्राचार्य शिवाजीराव देवढे यांनी केले.
सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकात दि. २६ ते ३० जानेवारी २०२२ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक अभ्यासक प्राचार्य शिवाजीराव देवढे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकशाही उत्सव समितीचे खजिनदार अशोक सब्बन होते. लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे, सचिव अर्शद शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी लोकशाही उत्सव आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार समितीचे सचिव अर्शद शेख यांनी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बापू चंदनशिवे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय सोनाली शिंदे यांनी करून दिला.
कॉ. स्मिता पानसरे, कॉ. बन्सी सातपुते, संजय झिंजे, शिवाजी नाईकवडी, आबेदखान दुलेखान, डॉ भोजने, कॉ. महेबूब सय्यद, अँड.रविंद्र शितोळे, विठ्ठल बुलबुले, कारभारी गवळी, संध्या मेढे , सुधीर लंके,प्रा.बापू चंदनशिवे, अँड.संतोष गायकवाड, सोनाली शिंदे, सुनिल गोसावी, बाळासाहेब उबाळे आदीसह नागरिक उपस्थित होते.