अहमदनगर दि. 16 जानेवारी (प्रतिनिधी ): शहरातील लँड माफिया टोळीच्या वतीने नामांकित हिंद सेवा मंडळ, सारडा महाविद्यालयाचा सुमारे रु. २२५ कोटींचा मोक्याच्या ठिकाणी असणारा भूखंड हडपण्याचे षडयंत्र रचले गेले आहे.
भविष्यात यावर विविध प्रकारचे बांधकाम करून सुमारे रु. ५०० कोटींचा व्यवहार केला जाणार आहे. लवकरच त्याला मूर्त रूप दिले जाणार आहे. या प्रकरणात सदर टोळीशी संगनमत केलेले काही दलाल लोक प्रत्येकी तीन खोक्यांच्या प्रलोभनास बळी पडून मांडवली करत आहेत. कुंपणच शेत खात आहे. रु. १० ते १५ कोटींच्या कवडीमोल भावात जागा हडपण्याचा डाव शिजला आहे. माजी आ.अरुण बलभीम जगताप, बिल्डर हर्षल संतोष भंडारी यांनी सारडा महाविद्यालयाच्या जागेचा ताबा देण्याची लेखी मागणी केली आहे. किती रकमेला जागा घेणार याचा कोणताही उल्लेख माञ जाणिवपूर्वक करण्यात आलेला नाही. मंडळाच्या सहा प्रामाणिक विश्वस्तांनी या सर्व प्रकाराला कडाडून लेखी विरोध केला असल्याचा दावा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केला आहे. मंडळाच्या चांगल्या कामाला संपूर्ण सहकार्य करणार असून चुकीच्या कामांना मात्र शहरातील तरुणांच्या शिक्षणाच्या व्यापक हिताच्या दृष्टीने विरोध करणार असल्याचे काळेंनी यावेळी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेत त्यांनी या प्रकरणाशी निगडीत अनेक महत्त्वपूर्ण कागदोपत्री पुरावे माध्यमां समोर उघड केले. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, विलास उबाळे, विकास भिंगारदिवे, गौरव घोरपडे आदी उपस्थित होते. काळे बुधवारी नगरकरांच्या वतीने सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्याकडे सदर प्रकरणाबाबत लेखी तक्रार करणार आहेत. नगर मनमाड रोडवर राष्ट्रीय महामार्गा लगत स.नं.१६१/१ ची सुमारे ३ एकर २९ गुंठे एवढी मोक्याच्या ठिकाणी असणारी सारडा महाविद्यालयाची जागा व हिंद सेवा मंडळ गिळंकृत होऊ नये यासाठी वेळप्रसंगी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका, लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा काळेंनी दिला असून आम नगरकर जनतेच्या दरबारात देखील दाद मागणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी मंडळ, सारडा महाविद्यालयाची जागा वाचविण्यासाठी जनआंदोलन उभे करण्यासाठीची आगामी दिशा स्पष्ट करण्यार असल्याचे काळे यावेळी म्हणाले.
काळे म्हणाले, भारतातील एकेकाळी अग्रणी असणारी गुणे आयुर्वेद महाविद्यालय संस्था गिळंकृत करून राजकीय अड्डा करण्यात आला.
आता काहींचा हिंद सेवा मंडळ हडपण्याचा डाव आहे. शहरातील तरुणाईला सारडा महाविद्यालयातून मिळणारे शिक्षण आणि त्यामुळे मिळणारा रोजगार यामुळे बंद झाला तर चूकीचे होईल. नगरकर हे कदापि होऊ देणार नाहीत. हा राजकारणाचा विषय नसून शहरातील हजारो तरुणांच्या भवितव्याचा संवेदनशील विषय आहे. हिंद सेवा मंडळाची कदापी आयुर्वेद संस्था होऊ देणार नाही. यापूर्वी काहींनी केला तेवढा नंगा नाच पुरे. नगर शहराच्या तरुणाईला शिकू द्या. या शहरातच रोजगार मिळू द्या. कष्टाने दोन पैसे कमवून स्वाभिमानाने जगू द्या. काहींच्या पापांचा घडा भरला आहे. काही दलालांचे उखळ या गैरव्यवहारात मजबूत पांढरे झाले आहे. परंतु पुढील शेकडो पिढ्यांचे शिक्षणाचे स्वप्न त्यामुळे उद्ध्वस्त केले जात आहे.
९९ वर्षांचा करार, अजून ४० वर्ष बाकी :
गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाच्या हेतूने मंडळाच्या तेव्हाच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली. संस्थेचे तत्कालीन सचिव नानासाहेब निसळ, डॉ. नारायण करमरकर, डॉ. श्रीनिवास कुलकर्णी या स्वातंत्र्य सैनिकांनी सय्यद हाजी हमीद तकिया ट्रस्टीशी संपर्क साधून नाममात्र दराने सदर जागा १९६४ साली ९९ वर्षांच्या भाडेकराराने घेतली. १९९५ च्या सुमारास तकीया ट्रस्टने सदर जागा लूनिया, मुनोत यांना विकली. नव्या मालकांनी जागा खाली करून द्यावी म्हणून सिव्हील कोर्टात दावा दाखल केला. परंतु २००६ ला न्यायालयाने हिंद सेवाचा कब्जा वैद्य ठरवला. त्यामूळे भडेकराराची अजूनही ४० वर्षे बाकी आहेत. सदर करारनाम्याचा दस्तऐवज, न्यायालयाचा आदेश काळेंनी उघड केला आहे. निकाल लागल्यापासून या मोक्याच्या जागेवर ताबेमारीचे सतत प्रयत्न सुरू आहेत. शहरातील ताबेमारी आणि झालेली हत्याकांडं नगरकर विसरलेले नाहीत. हे संबंधितांनी विसरू नये, अशी खोचक आठवण किरण काळे यांनी करून दिली आहे.
सहा महिन्यांत असे काय घडले ? :
२१ जून २०२३ ला अज्ञात लोकांच्या होणाऱ्या त्रासाबद्दल वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस मंडळाने दिली होती. २५ एप्रिल २०२३ ला मनपा आयुक्तांना अन्य कोणाचाही लेआउट प्लॅन मंजूर करण्यास हरकत घेणारे पत्र दिले होते. पोलिसांत गुंडांपासून होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली होती. मात्र जुलै पासून काही लाभार्थ्यांनी भूखंड माफियांशी हातमिळवणी करत अचानकपणे दलालीची भाषा सुरू केली. काहींची भूमिका खोक्यांसाठी बदलली तर काही दहशतीला बळी पडले. सहाच महिन्यात नेमके असे काय घडले की, जागेचा ताबा टिकवण्यासाठीची, संरक्षण करण्यासाठीची भूमिका बदलून ताबा सोडण्याला अनेकांची संमती मिळू लागली. अशी कोणती जादूची कांडी फिरली, असा सवाल काळे यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रत्येकी तीन खोक्यांचा मलिदा :
गंभीर आरोप करताना काळे म्हणाले, माजी आमदार जगताप यांनी घुसवलेल्या तथाकथित दलालांनी त्यांना मिळणाऱ्या प्रत्येकी तीन खोक्यांच्या मलीद्याच्या मांडवलीला स्मरून बहुमताने ठराव पारित करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यांच्यातील काही दलालांना यात कमी वाटा दिला जात होता. जागेचा लेखी ताबा मागणाऱ्यांचेच काही अल्पसंतुष्ट दलाल, तसेच सारडा महाविद्यालयाचे वाटोळे होऊ नये असे वाटणाऱ्या मंडळाच्या काही हितचिंतकांनी या षडयंत्राची कागदपत्रे आपल्याला दिल्याचा दावा काळे यांनी केला आहे.
विरोध करणाऱ्यांना पैशांचे खोके, पेट्यांची प्रलोभने दाखवली जात आहेत. काहींची सुमती भ्रष्ट झाली आहे. एक वकील देखील या दलालीत गुंतला आहे. २१ जानेवारीला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत कोणी विरोध करू नये म्हणून दहशत करण्याचे नियोजन केले गेले आहे. आजीव सदस्य करून घेतलेल्या काही भाडोत्री टोळ्या सभेत बहुमताने ठराव मंजूर करुन घेण्यासाठी आणण्याचा डाव आहे. राज्यात महायुतीची सत्ता आहे. आम्ही शहराचे आजी, माजी आमदार आहोत. खासदार आणि पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही धर्मदाय कार्यालयावर दबाव टाकून परवानगी आणू. त्यामुळे कोणी विरोध करायचा नाही, असे जागेचा ताबा मागणारे माजी आमदार सदस्यांना धमकावत असल्याची चर्चा असल्याचा गंभीर आरोप काळे यांनी यावेळी केला.
सहा विश्वस्तांचा विरोध :
कार्यकारिणीच्या ३ जानेवारीला पार पडलेल्या बैठकी पूर्वीच, संस्थेच्या जागांचा ताबा सोडत मंडळाच्या सार्वजनिक मालमत्तेवर घातल्या जाणाऱ्या दरोड्याला लेखी पत्र देऊन काहींनी विरोध केला आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, मधुसूदन सारडा, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श शिक्षक व आरएसएसचे जेष्ठ नेते मकरंद खेर, भाजपचे ज्येष्ठ नेते अनंत देसाई, विष्णूशेठ सारडा, शामसुंदर सारडा या सहा विश्वस्तांचा समावेश आहे. त्यांच्या विरोधाची पत्रच काळे यांनी उघड केली आहेत. त्यांची प्रामाणिकता, निर्भीडता कौतुकास पात्र आहे. या भूखंड घोटाळ्याचा मलिदा लाटणाऱ्यांचा माञ भांडाफोड करणार असल्याचा इशारा किरण काळे यांनी दिला आहे.
इंच भर ही मागे हटणार नाही :
माझी प्रामाणिक निष्ठा जनतेशी आहे. शहराचा विकास आणि शहर दहशतमुक्त करणे हे काँग्रेसचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे माझ्यावर हल्ले, खोटेनाटे आरोप करण्यासाठी अनेकांना पुढे करण्याची मालिका सध्या काहींची सुरू आहे. पण त्या गोष्टींना मी भीक घालत नाही.मी आणि विरोधक कोण किती पाण्यात आहे हे नगरकरांना माहिती आहे. त्यावरती मी खुलासा देण्याची गरज नाही. नगरकरांची अविरत सेवा मी करत राहणार आहे. इंच भरी देखील मागे हटणार नाही, असे काळे यांनी यावेळी सांगितले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा