महसूलच्या विरोधात १५ डिसेंबरला रेल्वे माल धक्क्यावरील माथाडी कामगारांचा भव्य आक्रोश मोर्चा १३ डिसेंबर पूर्वी मागण्या मान्य मागणी, अन्यथा मोर्चा

- अहमदनगर दि.10 डिसेंबर (प्रतिनिधी ): मागील सुमारे दोन वर्षांपासून कामगारांचे ठेकेदारांकडे असणारे कोट्यावधी रुपयांचे थकीत वेतन माथाडी मंडळ देण्यास तयार नाही. कामगारांच्या रेट्यानंतर ठेकेदारांच्या खाजगी मालमत्तांची जप्ती करून वसुलीची प्रक्रिया मंडळाने सुरू केली. मात्र महसूलमध्ये अपेक्षित कार्यवाही होत नाही. माथाडी मंडळ ठेकेदारांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे माल धक्क्यावरील कामगारांचा मुलाबाळांसह नगर शहराच्या बाजारपेठेतून येत्या १५ डिसेंबरला शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे व शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे.
सध्या विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सहाय्यक कामगार आयुक्त तथा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाचे अध्यक्ष नितीन कवले यांची भेट घेऊन शेकडो कामगारांच्या सह्यांचे लेखी पत्र देण्यात आले आहे. पत्राची प्रत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री, कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, कामगार सहआयुक्त (मुंबई), कामगार उपायुक्त (नाशिक), शहर उपजिल्हा पोलीस अधीक्षक, कोतवाली पोलीस निरीक्षक, तोफखाना पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक यांना देखील देण्यात आली आहे. यावेळी रोहिदास भालेराव, विलास गुंड, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, बाळासाहेब अनारसे, मंगेश एरंडे, संजय माळवे आदींसह कामगार उपस्थित होते.
याबाबत माथाडी काँग्रेस विभागाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मोठ्या संख्येने कामगार बांधव आपल्या कुटुंबीयांसह मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत. महसूल मंत्री हेच पालकमंत्री असून जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यांचेच चिरंजीव खासदार आहेत. आहेत. तरी देखील माथाडी मंडळ, महसूल विभाग मुठभर ठेकेदारांना वाचविण्यासाठी कामगारांवर अन्याय करत आहे. आम्ही आमच्या घामाचा, कष्टाचा थकित वेतनाचा मोबदला मागत आहोत. मात्र तो आम्हाला जाणीवपूर्वक दिला जात नाही. आम्ही सातत्याने अनेक आंदोलने, उपोषण, निदर्शने, कागदोपत्री पाठपुरावा केला. मात्र त्याची कोणतीही दखल घेतली जात नाही. कामगारांना मोर्चा काढावा लागतो आहे हे दुर्दैवी आहे.
कामगारांच्या प्रमुख चार मागण्या आहेत. पहिल्या टप्प्यातील थकीत वसुली तात्काळ पूर्ण करण्यात यावी. दुसऱ्या टप्प्यातील कार्यवाही तात्काळ सुरू करून कामगारांच्या खात्यात एक महिन्यात रक्कम जमा करावी. मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या आदेशाची अंमलबजावणी करून माहे डिसेंबर पासून होणारा पगार सुधारित दराने देण्यात यावा. तसेच विळद माल धक्का येथे नव्याने सुरू करत आलेले काम बंद करून सर्व काम एकत्रितरित्या पूर्वी प्रमाणे अहमदनगर शहर रेल्वे स्टेशन माल धक्का येथेच सुरु ठेवावे. १३ डिसेंबर पूर्वी कामगारांचे मागण्या मान्य न झाल्यास १५ ला मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी १०.३० वाजता निघणाऱ्या मोर्चाचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते क्रांतीसुर्य महात्मा फुले पुतळा ते पंचपीर चावडी ते आशा टॉकीज ते शनी चौक ते पटवर्धन चौक ते चौपाटी कारंजा ते तेली खुंट ते एमजी रोड असा आहे. भिंगारवाला चौक येथे समारोपाची चौक सभा होणार आहे. त्यानंतर कामगारांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देणार आहेत असल्याची माहिती विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे.