हिंदू – मुस्लिम बांधवांचा एकोपा नगर शहरासाठी मान उंचावणारी ओळख – किरण काळे
काँग्रेसने गुलाब पुष्प वितरीत करत दिल्या मुस्लिम बांधवांना रमजान ईद सण, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

अहमदनगर दि.३ मे (प्रतिनिधी) : कोरोना नंतर पहिल्यांदाच रमजान ईद नगर शहरामध्ये उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते ईदगाह मैदानामध्ये मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प वितरित करत रमजान ईद सण, अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देण्यात आल्या. हिंदू – मुस्लिम बांधवांचा एकोपा ही नगर शहरासाठी मान उंचावणारी ओळख असल्याचे प्रतिपादन यावेळी काळे यांनी केले.
यावेळी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, नगरसेवक आसिफ सुलतान, सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख, माजी नगसेवक फय्याज शेख, जुबेर सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष खालील सय्यद, निजाम जहागीरदार, हनीफ जहागीरदार, शहर जिल्हा सचिव अन्वर सय्यद, मोबीन शेख, इंटक जिल्हाध्यक्ष हनिफ शेख, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील, संजय भिंगारदिवे, संजय भोसले, गणेश आपरे, भिंगार काँग्रेसचे सागर चाबुकस्वार, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळे म्हणाले की, भारत देश हा संविधानावर चालतो. भारत देशामध्ये विविध जाती धर्मांचे लोक गेल्या अनेक दशकांपासून गुण्यागोविंदाने राहत आहेत. आजही नगर शहरामध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये असणारा एकोपा ही शहराची खास ओळख आहे. समाजात जातीय तेढ निर्माण करण्याऐवजी आणि धर्म धर्मांमध्ये भेद करण्याऐवजी मानवता हाच धर्म मानून सर्व धर्मियांना एकत्र राहत शांततेचा संदेश देणे ही काळाची गरज आहे.
धार्मिक विद्वेषाचे राजकारण हे समाजामध्ये नेहमी विष पसरवते. यातून शांतता भंग पावते आणि विकासाच्या मुद्यापासून लक्ष जाणीवपूर्वक दूर केले जाते. मात्र आता समाजाला या गोष्टींची जाणीव झाली असून मानवता हाच धर्म समजत सर्व धर्मियांनी एकत्र राहत आपापसातील बंधुभाव वाढविण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. रमजान ईद आणि अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा या वेळी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगरकरांना आपण देत असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे.