नगरकरांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याकडे नगरकरांनी पाठ फिरवली, काँग्रेसची टीका “जन की बात” करणाऱ्या राहुल गांधींवर टीका करण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही : किरण काळे

अहमदनगर दि.25 सप्टेंबर (प्रतिनिधी) : नऊ वर्षात सामान्य जनतेला उधवस्त करणारी अतिप्रचंड महागाई, कोट्यावधी तरुणांची बेरोजगारी, देशोधडीला लागलेला व्यापार यामुळे मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी मतदार योग्य संधीची वाट पाहत आहेत. शहराच्या भर चौकात स्क्रीन लावून देखील नागरिक तर दुरच पण कार्यकर्ते सुद्धा अपेक्षित संख्येने न जमल्यामुळे भाजपातूनच मोदींच्या ‘मन की बातला’ पसंती राहीलेली नाही. ‘जन की बात’ करणाऱ्या राहुल गांधीं मागे देश उभा राहत आहे. नैतिकता गमावलेल्या भाजपला गांधींवर टीका करण्याचा कोणताही अधिकार नाही. शहरात झालेल्या मुसळधार पावसाने हवालदिल झालेल्या नगरकरांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याकडे नगरकरांनी पाठ फिरवल्याची टीका शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळेंनी केली आहे.
शहर भाजप व दक्षिणेच्या खासदारांच्या वतीने मध्यवर्ती बाजारपेठेतून प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळेंच्या ‘घर चलो अभियानांतर्गत’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नुकत्याच शहर काँग्रेसच्या वतीने माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, आ. रवींद्र धंगेकरांच्या उपस्थितीत किरण काळेंच्या नेतृत्वाखाली काढलेल्या भव्य जनसंवाद यात्रेला काँग्रेस कार्यकर्त्यांसह व्यापारी, नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिलाचा दावा शहर काँग्रेसने केला असून भाजपच्या अभियानाकडे माञ पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच पाठ फिरवल्यामुळे शक्तीहीन झालेल्या भाजपचा शक्ती प्रदर्शनाचा डाव फसल्याचा घाणाघात काँग्रेसने केला आहे. भाजप कार्यकर्त्यांसाठी एका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेला कार्यकर्ता संवाद कार्यक्रम सुद्धा रद्द करण्याची नामुष्की भाजपवर आल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. बाजारपेठेतील काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेला मिळालेला मोठा प्रतिसाद व भाजपच्या अभियानाला मिळालेल्या अल्प प्रतिसादाचे फोटोच काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलेच व्हायरल केले आहेत.
दक्षिण लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख घरांशी संवाद साधण्यासाठी घर चलो अभियाना घेऊन आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष पावसामुळे शहरातील ज्या हजारो नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यांच्या घरी गेले नाहीत. बावनकुळेंनी ज्या गोरगरिबांचा संसार काल वाहून गेला, व्यापाऱ्यांचा माल वाहून गेला, नुकसान झाले त्यांचे दुःख जाणून घेतले नाही. मनपात विरोधी बाकावर असून देखील सत्ताधाऱ्यांबरोबर असणाऱ्या भाजपची गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्ता असून देखील नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देऊ यासाठी साधा ब्र सुद्धा त्यांनी काढला नाही. मनपा व जिल्हा प्रशासनाला कुठल्या सूचना केल्या नाहीत. त्यामुळे घर चलो अभियान ही भाजपची नौटंकी असल्याचा आरोप किरण काळेंनी केला आहे.
काळे म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्वतः स्पष्ट केले आहे की घटक पक्षांना सोबत घेऊन महायुतीचा विजय करू. आ.बावनकुळेंच्या या वक्तव्याने त्यांनी सूचकपणे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शहराच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला लागण्याचे आदेश दिले आहेत. बावनकुळेंनी भाजपच्या कार्यक्रमासाठी शहरात येत राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी मोर्चेबांधणी केल्यामुळे निष्ठावान भाजप तसेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाराज झाले असून भविष्यात ते काँग्रेस समवेत दिसतील, असा दावा काँग्रेसने केला आहे.
दरम्यान, एकाच पावसात शहराच्या नाल्या तुंबल्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक रस्ते अक्षरशः वाहून गेले आहेत. शहराचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. नुकसानग्रस्तांना मनपाने राज्य सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याच्या मागणीसह विविध मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस शिष्टमंडळ सोमवारी मनपा आयुक्तांना भेटणार असल्याची माहिती मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे यांनी दिली आहे.