टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे – महसूल राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचना संगमनेर येथे टंचाई आढावा बैठक संपन्न

शिर्डी, दि.२० सप्टेंबर (प्रतिनिधी )- जिल्ह्यात यंदा दुर्दैवाने अद्यापपर्यंत पुरेशा पाऊस झाला नाही. त्यामुळे टंचाईची परिस्थिती आहे. हे मान्य करावे लागेल. टंचाईत पिण्याचे पाणी व चारा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर काम करावे. अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण यांनी आज येथे दिल्या.
संगमनेर तालुका टंचाई आढावा महसूलमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, संगमनेर उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, गटविकास अधिकारी अनिल नागणे आदी उपस्थित होते.
यावेळी संगमनेर गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी संगमनेर पाणी टंचाईचे सादरीकरण केले. संगमनेर मध्ये २० सप्टेंबर पर्यंत ३९ टक्के पर्यंत १३७ मिलीमीटर पाऊस पडला आहे. ४७ टंचाई गावापैंकी २१ गावांत २५ हजार ७७४ व्यक्तींसाठी पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, संगमनेर मध्ये ३८ टक्के पाऊस झाला आहे. आपल्या समोर पिण्याच्या पाण्याचे आवाहन आहे. धरणातील पाणी आपण पिण्यासाठी राखून ठेवले आहे. भीषण टंचाईला आपण सामोरे जात आहोत. माणसांसोबत जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपल्याला सोडवावा लागणार आहे. चारा उत्पादनाचा आपल्यापुढे प्रश्न आहे. चारा निर्मिती करण्यास आपण प्राधान्य देत आहोत. शेतकऱ्यांनी चारा उत्पादन करावे आपण विकत घेऊ. शेतकऱ्यांना ६ रूपये किलोने मूरघास उत्पादन केले जाणार आहे. तहसीलदार किंवा गटविकास अधिकारी यांच्या अहवालावर गावांना टॅंकरने पुरवठा करण्यात येईल. विहिरीत पाणी न टाकता पाण्याच्या टाकीतूनच पाण्याचा पुरवठा करावा.चारा मागणी असेल ती नोंदवावी. असे आवाहनही पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
गावकऱ्यांची मागणी आल्यापासून पाच दिवसांत टॅंकर सुरू झाला पाहिजे. जीवन प्राधिकरणाच्या सर्व योजना कार्यान्वित करण्यात यावे. टॅंकरचे वेळापत्रक तयार करावे. ग्रामसेवक व तलाठ्यांनी हजर राहिले पाहिजे. जनतेला वेळेत सुविधा उपलब्ध करून देणे शासनाचे काम आहे. शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी.असा सूचनाही पालकमंत्री श्री.विखे पाटील या़नी यावेळी दिल्या.
पठार भागात प्रांताधिकारी, गटविकास अधिकारी व तहसीलदारांनी पाहणी दौरे करावेत. पठार भागाचा स्वतः दौरा करून समस्या समजून घेणार असल्याचे ही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महसूल, जिल्हा परिषद, पाणी पुरवठा, बांधकाम, महावितरण या विभागाचे अधिकारी उपस्थित होते.