सावेडीत वंचित बहुजन आघाडीचे ज्योतिबा फुलेंना अभिवादन महात्मा ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली -योगेश साठे

अहमदनगर दि. ११ एप्रिल (प्रतिनिधी) – समाजातील तळागाळातील लोकांमध्ये आपल्या हक्काची जाणिव व्हावी, बहुजन समाजात शैक्षणिक व सामाजिक विकास घडविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी जनजागृती केली. कोणताही माणूस जन्माने अथवा जातीने श्रेष्ठ-कनिष्ठ नसतो तो स्वत:च्या कर्तुत्वावर लहान-मोठा ठरत असतो. सामाजिक व आर्थिक विषमतेवर उभारलेल्या समाज व्यवस्था मोडून समतेवर आधारलेली नवसमाज निर्मिती व्हावी या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे महासचिव योगेश साठे यांनी केले.
सावेडीत गुलमोहोर रोड, पोलिस चौकात वंचित बहुजन आघाडी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा महासचिव योगेश साठे, स्वप्नील वैद्य, अशोक औटी, गणेश जपे, खंडेश्वर पानमळकर, अशोक देवढे, ज्ञानेश्वर वाघमारे, बबन गाडे, देवीदास कोकाटे, अमोल पानसरे, सचिन गायकवाड, अॅशड.लक्ष्मीकांत पठारे, शिरिष जानवे आदि उपस्थित होते.
श्री.साठे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. ते पुढे म्हणाले, ज्योतिबा फुले हे लोकशाहीचे खरे पुरस्कर्ते होते. लोकशाही ही जीवनप्रणाली व्हावी, गरीब-श्रीमंत, उच्च-कनिष्ठ, मालक-मजूर ही मांडणी केवळ लोकशाही प्रणालीच बदलू शकते, या विश्वासावर समाज परिवर्तन न्यायधिष्ठित समाज निर्मिती या गोष्टी लोकशाहीतच घडू शकतात हे ध्येय समोर ठेवून ज्योतिबा फुले यांनी काम केले. भारतीय समाज क्रांतीचे जनक म्हणून त्यांचा उल्लेख समाजातील विचारवंत, शास्त्रज्ञांनी केला असून, तो सार्थकच आहे, असे योगेश साठे यांनी सांगितले.