“त्यांनी” हिम्मत असेल तर समोर येऊन लढावं, मग दाखवू – काळेंचे आव्हान केडगाव दगडफेक दहशत माजवण्यासाठी, पोलिसांनी यांना आवर घालावा

अहमदनगर दि. १६ फेब्रुवारी (प्रतिनिधी): केडगावमध्ये दहशत करण्याचं काम सोयऱ्या – धायऱ्यांच्या गुंडांच्या टोळीने केलं. कट रचून दगडफेक केली. त्यांनी हिम्मत असेल तर समोर येऊन लढावं. मग यांना दाखवू कुणात किती दम आहे, असे म्हणत काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केडगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आव्हान दिले आहे. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत संजय झिंजे भ्याड हल्ला प्रकरणानंतर लगेचच घडलेली ही दुसरी मोठी घटना आहे. पोलिसांनी यांना आवर घालावा. नाही तर आता जनताच रस्त्यावर उतरत एल्गार करेल, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.
घटना घडली त्या रात्री काळे यांच्यासह काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते पाटील यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित होते. यावेळी गुन्हा दाखल करून घेताना पोलिसांनी विनाकारण वेळ लावला. प्रतिसाद दिला नाही. नगरसेवक अमोल येवले यांना पोलिसांच्या चुकीच्या भूमिकेमुळे रात्रभर ठिय्या मांडावा लागला. पहाटे पर्यंत हा सगळा प्रकार सुरू होता, असे काळे यांनी म्हटले आहे.
आजही हा महाराष्ट्र अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक हल्ला प्रकरण विसरलेला नाही. ज्या शहरात पोलिसच असुरक्षित आहेत तिथं मायबाप जनता कशी सुरक्षित राहू शकते ? केडगावमध्ये गुंडांच्या टोळीने धुडगूस घालत घातलेला हैदोस हा यांच्या राजकीय गुंडगिरीचा भाग आहे. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून गुंडगिरीच्या जीवावर राजकारण करत त्यांचे समाजाला वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.
काळे म्हणाले की, ओंकार सातपुते लढवय्या कार्यकर्ता आहे. संपूर्ण काँग्रेस त्याच्या मागे आहे. त्याच्यावर खोटेनाटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खोटे गुन्हे दाखल करण्यातच या सोयाऱ्या – धायऱ्यांना मर्दानगी वाटते. यांच्या दुष्कृत्यांचा पापाचा घडा भरत आला आहे. इथून पुढ कुणी दहशत करत अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिंगावर घेऊन आपटायचं काम केलं जाईल, असा खणखणीत इशारा काळे यांनी काँग्रेसच्यावतीने केडगाव प्रकरणावरून दिला आहे.
मध्यमांसाठी महत्त्वपूर्ण टीप : परवा रात्री घटना घडल्यानंतर काल मुंबई येथे प्रदेश कार्यकारिणीची बैठक असल्यामुळे या संदर्भात तातडीने भूमिका मांडता आली नव्हती. उद्या (दि. १७) सकाळी संगमनेर येथे हात से हात जोडो अभियानाचा काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ असल्याने आजच संगमनेरकडे रवाना झाल्यामुळे पत्रकार परिषद घेता येऊ न शकल्यामुळे प्रसिद्धी पत्रकारद्वारे भूमिका मांडत आहे.