प्रशासकिय

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्‍ह्यातील खरीप हंगाम पूर्व तयारीचा आढावा

*अहमदनगर दि. 30 (प्रतिनिधी) :- जिल्‍हास्‍तरावरील सन 2022 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत राज्‍याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्‍या कामकाजाचा व तयारीचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भातील बैठकीचे पालकमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते.
या बैठकीला आमदार लहु कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्‍हा कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप, जिल्‍हा दुय्यम निबंधक दिग्विजय आहेर, कृषी उपसंचालक अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विलास नलगे, श्रीरामपूर, सुधाकर बोराळे, संगमनेर, उपसंचालक (आत्‍मा), आर. के. गायकवाड आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येत्‍या खरीप हंगामात शेतक-यांना शेतीसाठी आवश्‍यक असलेले बी-बीयाणे, खताचा पुरवठा या महत्‍वाच्‍या बाबींचे नियोजन करून त्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्‍यावी तसेच जिल्‍ह्यातील ऊस उत्‍पादकांचा ऊस शिल्‍लक राहता कामा नये याचेसुध्‍दा नियोजन करावे. यासंदर्भात जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यतेखाली ऊस कारखानदारांच्‍या व्‍यवस्‍थापनासोबत तात्‍काळ बैठक लावावी, अशा सूचनाही त्‍यांनी यावेळी संबंधितांना दिल्‍यात.
जिल्‍ह्यात रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही याचे सुध्‍दा नियोजन करावे. बियाणेसंदर्भात खाजगी कंपनीकडून वेळेत बियाणे शेतक-यांना उपलब्‍ध करून द्यावे. शेतक-यांना गुणवत्‍तापूर्ण निविष्‍ठा मिळण्‍यासाठी एकुण 42 गुणवत्‍ता नियंत्रक निरीक्षक कार्यरत असून त्‍यांच्‍या माध्‍यमातुन एकुण 15 भरारी पथकांची स्‍थापना करण्‍यात आली आहे. कृषि निविष्‍ठाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी तसेच अडचणी सो‍डविण्‍यासाठी व त्‍यांच्‍या तक्रारींचे निवारण करण्‍यासाठी 18002334000 हा टोल फ्री क्रमांक व 0241-2353693 हा लँडलाईन क्रमांक देण्‍यात आला आहे. अशी माहिती दिली.
शेतक-यांना जिल्‍ह्यातील प्रत्‍येक कृषि सेवा केंद्रातील खताचा आजच्‍या तारखेचा साठा कळण्‍यासाठी एक ब्‍लॉग पोस्‍ट तयार करण्‍यात आला आहे. ग्राम कृषि विकास आराखड्याच्‍या माध्‍यमातुन प्रत्‍येक गावाचे खरीप नियोजन करण्‍यात आले आहे. मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्‍यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्‍पांतर्गत अहमदनगर जिल्‍ह्यामध्‍ये सर्वाधिक 261 अर्ज प्राप्‍त झाले असून त्‍यापैकी राज्‍यात सर्वाधिक 44 प्रकल्‍पांना जिल्‍ह्यातून मंजूरी मिळाली आहे. यामध्‍ये जास्‍तीत-जास्‍त 2 कोटी किंवा 60 टक्‍के अनुदान आहे. मुख्‍यमंत्री शाश्‍वत सिंचन योजनेअंतर्गत सन 2021 पासून शेतक-यांना ठिबक सिंचनासाठी राज्‍य शासनामार्फत अधिकचे अनुदान देण्‍यात येत असून अल्‍प भुधारक शेतक-यांना 80 टक्‍के व बहु भुधारक शेतक-यांना 75 टक्‍के अनुदान देण्‍यात येत आहे. कृषि पतपुरवठ्यामध्‍ये सन 21-22 मध्‍ये 5 हजार 775 कोटी लक्षांपैकी 5 हजार 308 कोटी म्‍हणजे 92 टक्‍के वाटप झाले आहे. सन 2022 खरीपासाठी 3 हजार 914 कोटी व रब्‍बीसाठी 2 हजार 108 कोटी असे एकुण 6 हजार 022 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्‍टे ठ‍रविण्‍यात आले आहे. असे पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
बैठकीच्‍या सुरूवातीला जिल्‍हा कृषि अधिक्षक श्री. जगताप यांनी खरीप हंगामपूर्व तयारी व नियोजनाचा आढावा सादर केला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे