राजकिय

मनपावर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात मोर्चेबांधणी करावी – माजी आ. मोहन जोशी 📍 पुढील महिन्यात मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या करणार – किरण काळे

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहरामध्ये काँग्रेसला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे. शहरातील दुरावस्थेला नागरिक कंटाळलेले आहेत. नागरी प्रश्नांवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रभागस्तरावर आक्रमक भूमिका घेत लोकांच्या अडचणी सोडविण्यासाठी धावून जाण्याचे काम करावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात आत्तापासूनच जोरदार मोर्चेबांधणी करावी, असे आवाहन प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे.
माजी आ. जोशी, काँग्रेसचे पक्ष निरीक्षक तथा प्रदेश सरचिटणीस वीरेंद्र किराड यांनी संघटनात्मक आढावा घेण्यासाठी नगर शहराचा दौरा केला. यावेळी शहर जिल्हा काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी आ. जोशी बोलत होते. पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती राहिलेल्या किराड यांच्यावर नगर शहर निरीक्षक म्हणून पक्षाने जबाबदारी सोपविलेली आहे. यावेळी किराड यांनी देखील कार्यकर्त्यांना पक्षाच्या सर्व फ्रंटल, सेल, विभाग अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या.
माजी आ. मोहन जोशी यावेळी बोलताना म्हणाले की, सामान्य माणसाचे अश्रू पुसायचे असतील तर सत्ता महत्त्वाची आहे. महानगरपालिका शहर विकासासाठीची महत्त्वाची संस्था आहे. नगरकरांना न्याय द्यायचा असेल तर मनपामध्ये काँग्रेस विचारांची सत्ता असणे आवश्यक आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात हे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. कार्यकर्त्यांनी प्रत्येक प्रभागात सर्व समाज घटकांना बरोबर घेत संघटना मजबूत करण्याचे काम करावे.
पक्षनिरीक्षक वीरेंद्र किराड म्हणाले की, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, विद्यार्थी काँग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, मागासवर्गीय विभाग, क्रीडा काँग्रेस, सांस्कृतिक विभाग, ओबीसी विभाग, डॉक्टर सेल, वकील सेल, सामाजिक न्याय विभाग, सेवादल काँग्रेस या प्रमुख सेल, फ्रंटलसह सर्व विभागांची जोरदार बांधणी कार्यकर्त्यांनी करावी. आजादी गौरव महोत्सवाच्या माध्यमातून प्रभागातील शेवटच्या घटकापर्यंत संपर्क मोहीम राबवावी. आगामी मनपा निवडणूक ही काँग्रेस पक्ष ताकदीने लढविणार असून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना यावेळी संधी दिली जाईल.
किरण काळे म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून शहरात संघटनात्मक बांधणी सुरू आहे. पक्षामध्ये सातत्याने इनकमिंग सुरू आहे. अजूनही शहरातील अनेक चांगले चेहरे पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. योग्य टप्प्यावर त्यांचे देखील पक्षप्रवेश घेतले जातील. युवकांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मनपा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू करावी. पक्षाशी निष्ठावान असणाऱ्यांनाच संधी दिली जाईल. पुढील महिन्यामध्ये प्रत्येक प्रभागासाठी मंडल अध्यक्ष नियुक्त केले जातील.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी माजी आ. जोशी, निरीक्षक किराड, जिल्हाध्यक्ष काळे यांच्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या. नगरसेवक आसिफ सुलतान यांनी यावेळी निधी वाटपावरून आजादूजा भाव केला जात असल्याचा आरोप केला. किरण काळे यांनी राज्य सरकारकडून विकास कामांसाठी आणलेल्या दोन कोटी रुपयांच्या कामांना नव्या सरकारने दिलेल्या स्थगितीचा यावेळी त्यांनी निषेध केला.
जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, शहर जिल्हा उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सांस्कृतिक काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, माजी नगरसेविका जरीना पठाण, ब्लॉक काँग्रेसचे हनिफ मोहम्मद शेख, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, निलेशदादा चक्रनारायण, विनोद दिवटे, अरुण वाघमोडे, ब्लॉक काँग्रेसचे सागर इरमल, रवी शिंदे, रजिया शेख, सरकुंजा शेख, अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे