दोन युवकांच्या वैयक्तीक भांडणास जातीय रंग देण्याचा प्रयत्न नको. कर्जतमध्ये सामाजिक सलोखा काल पण होता. आज पण आहे आणि पुढे पण राहणार – सर्व पक्षीय आणि शहरातील व्यापारी बैठक संपन्न

कर्जत (प्रतिनिधी ): दि ६
कर्जत शहरात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव नसताना व काल झालेला प्रकार हा दोन तरुणामधील भांडणातून घडलेला आहे. मात्र त्यास बाहेरच्या शक्ती जातीय तेढ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करत असून कर्जत शहरातील नागरिक हे खपवून घेणार नाहीत. कर्जत शहरातील वाद समोपचाराने मिटविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. बाहेरच्यांनी यात लक्ष घालून येथील सामाजिक सलोख्याचे वातावरण बिघडवू नये असे आवाहन कर्जत नगरपंचायतीमध्ये झालेल्या सर्व समावेशक व्यापारी, राजकीय पक्ष, पदाधिकारी व नागरिकांच्या बैठकीत करण्यात आले.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रवीण घुले म्हणाले की, कर्जत ही ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाची भूमी आहे. आतापर्यत कधीही जातीय वाद येथे झालेला नसताना दोन तरुणामधील भांडणाचा संदर्भ असलेल्या घटनेला जाणून बुजून जातीय रंग दिला जात आहे. यामुळे कर्जतचे खूप मोठे नुकसान होत आहे. वास्तविक पाहता कर्जत शहरात कोणत्याही प्रकारचे तणावाचे वातावरण नाही. मात्र राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील न्यूज चॅनल येथील सत्य परिस्थिती जाणून न घेता आशा बातम्या देत आहेत की जणू येथे खुप काही घडले आहे. कर्जत शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम मीडियामधून केले जात असून चुकीच्या बातम्या करणाऱ्या न्यूज चॅनलचा निषेध करावा लागेल अशी परिस्थिती उद्भवली आहे. या न्यूजवाल्यानी कर्जतमध्ये यावे आणि कोठे जातीय तेढ आहे का ? हे स्वतः पाहावे. पण नाहक येथील वातावरण गढूळ करू नये. अन्यथा आम्हाला या विरुद्ध एकत्र लढावे लागेल असे घुले यांनी स्पष्ट केले.
यासह नामदेव राऊत यांनी बोलताना सांगितले की, कर्जत शहरात प्रत्येक धार्मिक सण, सोहळे, जयंती सर्वधर्मीय नागरिक मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे करतात. येथील सामाजिक सलोख्याचे वातावरण असून त्यास गालबोट लागू देता कामा नये. दोन युवकाचा वादाला जातीय रंग येता कामा नये यासाठी सर्वानी एकत्र असणे आवश्यक आहे. यापुढे कर्जतमधील कोणताही वाद असेल ते सर्वानुमते नियुक्त केलेली पंच कमिटी करून आपण मिटवू. यासाठी लवकरच पुन्हा बैठक घेण्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. तर व्यापारी असोशियनचे सचिव बिभीषण खोसे यांनी कर्जत मधील या घटनेला वेगळे रूप दिले जात असून ते योग्य नाही. शहरात कोणतीही घटना घडली की त्यासाठी कर्जत बंद करणे योग्य नाही. काल कर्जत शहरात जो अचानक बंद पुकारला तो व्यापाऱ्यांना मान्य नाही. जो वाद झाला तो मर्यादित कुटूंबामध्ये झालेला होता हे सर्वाना माहीत असताना अचानक पुकारलेल्या बंद मुळे अनेक व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाल्याचे यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त करताना कर्जत शहरात जातीय तेढ यापूर्वी कधी नव्हती. आज ही नाही व यापुढे ही असणार नाही असे अनेकांनी सांगितले. कर्जत शहरात सनी पवार यास झालेल्या मारहाण प्रकरणी काही बाहेरचे लोक उलट सुलट प्रतिक्रिया देऊन कर्जतला खूप मोठा गुन्हा घडला असल्यासारखे वार्तांकन करत असून हे योग्य नाही. आज काही राजकीय नेत्याच्या प्रतिक्रिया आल्यानंतर मुंबईत बसून कोणीही प्रतिक्रिया देऊ नये असे आवाहन यावेळी सर्वानुमते करण्यात आले. तर अशा पद्धतीच्या बैठकीत प्रशासकीय अधिकारी ही असले पाहिजेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले यानंतर लवकरच सर्व समावेशक बैठक घेतली जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.
सदर बैठकीत दीपक शिंदे, सुनील शेलार, संतोष म्हेत्रे, रज्जाक झारेकरी, संजय भैलूमे, भास्कर भैलूमे, प्रसाद शहा, अनिल भैलूमे, अभय बोरा, सतीश पाटील, अंबादास पिसाळ आदींनी आपले मनोगते व्यक्त केली. यावेळी अर्जुन भोज, संजय काकडे, समशेर शेख, शब्बीरभाई पठाण, सचिन कुलथे, काँग्रेसचे सचिन घुले, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, ऍड अशोक कोठारी, महावीर बोरा, किरण भैलूमे, संतोष भैलूमे, संजय भिसे, दत्तात्रय कदम, राजू बागवान, आदी उपस्थित होते. शेवटी रवींद्र सुपेकर यांनी आभार मानले.