देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 6 डिसेंबर: (प्रतिनिधी)- सिद्धार्थनगर येथील पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेत, ज्या पवित्र भूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः भेट देऊन आपला पदस्पर्श केला होता, त्या ऐतिहासिक स्थळावर महापरिनिर्वाण दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना कोटी-कोटी प्रणाम करण्यात आले.
या वेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयु. जगदीश भांबळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारुळे, तसेच युवा नेते सुरेशभाऊ बनसोडे, अशोकराव गायकवाड, विजयराव भांबळ, संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड, सचिव प्रा. जयंत गायकवाड, विश्वस्त रवींद्र कांबळे, किरण गायकवाड, विशाल गायकवाड, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, सुजन भिंगारदिवे, समीर भिंगारदिवे, सुभाष वाघमारे, दीपक वाघमारे, दीपक सरोदे, मोहन गायकवाड,
शाळेचे मुख्याध्यापक शेखर उंडे, वांगणे मॅडम, शिरसाट मॅडम, तिवारी मॅडम, उकर्डे सर, साबळे सर, पाखरे सर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी बाबासाहेबांनी या संस्थेला दिलेल्या भेटीची आठवण करून दिली व बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील मौल्यवान पत्रही मान्यवरांना दाखवण्यात आले.
यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आयु. जगदीश भांबळ म्हणाले की, महापरिनिर्वाण दिन हा फक्त स्मरणाचा दिवस नाही, तर बाबासाहेबांनी दिलेल्या विचारधारेची उजळणी करण्याचा दिवस आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेली समता, न्याय आणि मानवी स्वातंत्र्याची मूल्यव्यवस्था आजही समाजाला दिशा देत आहे.
या पवित्र स्थळी उभे राहून मला अत्यंत अभिमान वाटतो, कारण ही तीच जागा आहे जिथे बाबासाहेबांनी स्वतः भेट देऊन शिक्षणाची आणि सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली असल्याची भावना व्यक्त केली तर संस्थेचे अध्यक्ष सुमेध गायकवाड म्हणाले की, पंचशील विद्या मंदिर ही आमच्यासाठी केवळ शैक्षणिक संस्था नाही, तर ऐतिहासिक वारशाची पवित्र जागा आहे. कारण इथे स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेली आहे. त्यांच्या स्पर्शाने ही भूमी पावन झाली, हीच आमची सर्वात मोठी संपत्ती आहे.
आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आम्ही बाबासाहेबांच्या हस्तलिखित पत्राची प्रत मान्यवरांना दाखवण्याचा मान मिळाला. हा वारसा विद्यार्थ्यांसोबत समाजातील सर्व घटकांसाठी प्रेरणादायी आहे.
बाबासाहेबांनी दाखवलेल्या शिक्षण, प्रगती आणि समतेच्या मार्गावर संस्था ठामपणे वाटचाल करत राहणार असल्याची भावना व्यक्त केली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा