प्रशासकिय

ऊर्ध्व प्रवरा निळवंडे उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी‌‌ यशस्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते चाचणी

शिर्डी,दि.२२ जानेवारी (प्रतिनिधी ) ऊर्ध्व प्रवरा निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज पाणी सोडण्याची चाचणी यशस्वीपणे पार पडली.
यावेळी‌ खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, प्रदीप हापसे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले की,अनेक वर्षे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागला.पण आता पाण्याची प्रतिक्षा संपली आहे.डाव्या कालव्या प्रमाणेच उजव्या कालव्याला पाणी मिळाल्याने दोन्ही कालव्यावरील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या पुढाकाराने वरच्या भागातील कालव्यांच्या कामांना सुरूवात झाल्यामुळेच पाणी शेवटच्या गावाला मिळण्यात यश आले असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील म्हणाले.
लाभक्षेत्राातील तालुक्याची समृध्दता या प्रकल्पामुळे असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण झाले तो दिवस आपल्या सर्वासाठी ऐतिहासिक असा होता. आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रामलल्लांच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेदिवशी उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याचा निर्णय लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर तालुक्यातील काही गावात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या या नुकसान भरपाईचा प्रस्ताव महामंडळाच्या नियामक मंडळाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आला असून या नुकसानीची मदत लवकर मिळावी याकरीता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून विनंती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दळवळणाकरीता १२३ लोखंडी पुलाची मागणी असून या प्रस्तावास तातडीने मान्यता देण्यासाठी पाठपुरवा करण्याची ग्वाहीही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी दिली.
डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या वेळी दिलेल्या शब्दाची पूर्ती आज या निमित्ताने करण्यात येत आहे. ८४ किलोमीटर असलेल्या या उजव्या कालव्याचा अकोले, संगमनेर व राहुरी तालुक्यातील ६९ गावांना याचा लाभ होणार आहे. उजव्या कालव्यातून दीड टीमसी पाणी सोडण्याचे नियोजन असल्याचे सांगत यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे व जलस्रोतांना एक नवसंजीवनी मिळणार असल्याचेही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.
माजी मंत्री मधुकराव पिचड यांनी धरण आणि कालव्यांच्या कामाच्या वाटचालीचा आढावा घेत अनेकांच्या त्यागाने प्रकल्प उभा राहीला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती
बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डीले, माजी आमदार वैभव पिचड यांचीही समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभियंता कैलास ठाकरे यांनी केले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे