रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा, कामगारांनी केला जल्लोष न्यायालयाची ठेकेदारांना चपराक

अहमदनगर दि. 23 डिसेंबर (प्रतिनिधी) : अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यावधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलने, धरणे, मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीने सुमारे ५७८ कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जात आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने याप्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणी मध्ये १ एप्रिल २०२१ ते २५ एप्रिल २०२३ या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या ४०% तर मे ते डिसेंबर २०२३ या कालावधीतील ६०% रक्कम तात्काळ कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे. २५ जानेवारी २०२४ पूर्वी ही रक्कम भरण्याचा आदेश दिला असल्याची माहिती अहमदनगर माथाडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर विभागाचे अध्यक्ष सुनील भिंगारदिवे यांनी दिली आहे. यामुळे ठेकेदारांना चांगलीच चपराक बसली आहे.
न्यायालयाच्या या आदेशाची प्रत काँग्रेसच्या वतीने जारी करण्यात आली आहे. आदेशाचे प्रत प्राप्त होताच काळे, उबाळे, भिंगारदिवे यांच्या उपस्थितीमध्ये कामगारांनी एकच जल्लोष केला. फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात आली. गुलाल उधळत आनंद साजरा करण्यात आला. १५ डिसेंबरला शहर काँग्रेस कामगार आघाडीच्या वतीने महसूल विभाग, माथाडी मंडळाच्या विरोधात बायका, पोरांसह रस्त्यावर उतरत बाजारपेठेतून भव्य कामगार आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी व्यापारी, कामगारांनी एकमेकांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर १९ डिसेंबरला झालेल्या सुनावणी वेळी सरकारी पक्षाच्या वतीने कामगारांची बाजू ॲड. शरद नातू यांनी जोरदारपणे मांडली.
सामनेवाले ठेकेदार यांचेही म्हणणे कोर्टाने ऐकले. त्यानंतर कोर्टाने माथाडी कामगारांना दिलासा देणारा मोठा निर्णय दिला आहे.
किरण काळे म्हणाले, हा कामगार एकजुटीचा विजय आहे. कामगारांची व्यथा सरकारी पक्षाकडून मे. न्यायालयामध्ये यापूर्वी ताकदीने मांडली जात नव्हती. मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उबाळे, भिंगारदिवे यांच्या पुढाकारातून छेडण्यात आलेली तीव्र आंदोलने, निवेदने, सातत्यपूर्ण पाठपुरावा, मोर्चा याची दखल महसूल विभाग, माथाडी मंडळाला अखेर घ्यावी लागली. त्यामुळेच कोर्टा समोर यापूर्वी कधी न मांडलेले कामगार हिताचे महत्त्वपूर्ण मुद्दे यावेळी सरकारी पक्षाने जबाबदारीने मांडले. त्यामुळेच न्या. रवींद्र घुगे, न्या. वाय. जी. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने कामगारांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयाचे काँग्रेस व कामगारांच्या वतीने स्वागत आहे.
विलास उबाळे म्हणाले, निकाल कामगारांच्या बाजूने लागू नये म्हणून अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. पण भगवान के घर देर है, अंधेर नही. कामगार हा कष्टकरी आहे. त्याच्या घामाचे दाम त्याला मिळणं हा त्याचा अधिकार आहे. माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, किरण काळे यांनी कामगारांच्या मागे ताकद उभी केल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने १२ जानेवारीपर्यंत माथाडी मंडळाला सविस्तर ॲफिडेविट सादर करण्याचा आदेश केला आहे. या माध्यमातून कामगारांची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी मंडळा समवेत काँग्रेस कामगार शिष्टमंडळ लवकरच बैठक करेल. पहिल्या टप्प्यातील उर्वरित ६०% व दुसरा ४०% वेतनाचा फरक देखील कामगारांना मिळवून देण्यासाठी काँग्रेस भक्कमपणे लढा देईल.
सुनील भिंगारदिवे म्हणाले, ही कामगार आक्रोश मोर्चाची फलनिष्पत्ती आहे. मे. न्यायालयाचे कामगार आभारी आहेत. मोर्चा होऊ नये यासाठी अनेकांनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. मात्र सत्य परेशान हो सकता है, पराजित नही, हे न्यायालयाच्या निकालाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आयोजित जल्लोष सभेत अल्पसंख्यांक शहर काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, युवक काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, जयराम आखाडे, पोपट लोंढे, रोहिदास भालेराव, पंडित झेंडे, विलास गुंड, सागर पोळ, भगवान शेंडे, किशोर ढवळे, विजय वैरागर, दिपक काकडे, गणपत वाघमारे, बाबासाहेब वैरागर, देवराम शिंदे, किशोर जपकर, अनील जपकर, अनील कार्ले, संतोष भालेराव, संजय माळवे, कैलास कार्ले, सचिन वाघमारे, प्रशांत लक्ष्मण गायकवाड, कुमार डाके, बाळासाहेब अनारसे, बबन बनसोडे, अमर डाके, अंबादास कोतकर, राधेश भालेराव, नितीन भोंदे, सतीश शेंडे, मंगेश एरंडे, संतोष वाघमारे, सचिन लोंढे, अर्जुन जाधव, ईश्वर पवार, आतिश शिंदे, निलेश सोनवणे, नानासाहेब महारनवर, हरीभाऊ कोतकर, संदीप कार्ले, दिपक गुंड, ज्ञानदेव कदम, राजेंद्र तरटे, कौतीक शिंदे, संतोष गायकवाड, बबन डांगे, विजय कार्ले, विनोद केदारे, बाबासाहेब हजारे, आकाश ठोसर, नानासाहेब दळवी, संजय देठे आदींसह शेकडो कामगार सहभागी झाले होते.