स्वतःच करा स्वतःची ई- पीक पाहणी” -पालकमंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर दि.17 डिसेंबर (प्रतिनिधी )महसूल विभागामार्फत शेतकरी व नागरिकांच्या मदतीने ई- पीक पाहणीची मोहीम सुरु करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगाम अशा दोन्ही हंगामामध्ये शेतकऱ्यांना स्वतः आपल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई- पीक पाहणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्य शासनाने सुरु केलेला आहे. यासाठी ई- पीक पाहणीचे स्वतंत्र ॲप तयार करण्यात आलेले असून त्या द्वारे शेतकऱ्यांनी सुलभतेने स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः करून स्वतच ई- पीकपाहणी करावी असे राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले . राहता तालुक्यातील रांजणखोल येथे शेतातील पीक पाहणीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यात सध्या रब्बी हंगाम सुरु असून रब्बी हंगामाची ई- पीक पाहणी शेतकऱ्यांना करावयाची आहे. त्यासाठी प्लेस्टोअर वरून ई- पीक पाहणीचा नवीन व्हर्जन 2 ॲप इन्स्टॉल करावे. त्यापूर्वी जुने एप्लीकेशन डीलेट करून घ्यावे लागेल. ई- पीक पाहणी करतांना आपले शेतातील पिकांची फळ झाडांची, विहीर अथवा बोअरवेलची नोंद करता येणार आहे. शासनाच्या पीक विमा व नुकसानीचे अनुदान प्राप्त करण्यासाठी ई- पीक पाहणी असणे आवश्यक आहे.
असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वेळी पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मौजे रांजणखोल येथील सौ. संगीता दिलीप ढोकचौळे यांचा गट नंबर 136 मध्ये रब्बी पीक पाहणीची नोंद ई- पीक पाहणी ॲप मध्ये स्व हस्ते नोंद केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, आशिष येरेकर, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, जिल्हा कृषी अधिकारी सुधाकर बोराडे, उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील, सरपंच सौ. शुभांगी ढोकचौळे ,उपसरपंच चांगदेव ढोकचौळे, बाळासाहेब ढोकचौळे तसेच गावातील नागरीक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार, प्रतिष्ठित नागरिक व युवा यांनी शासनाच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पात सहभाग नोंदवावा. तसेच एका मोबाईलवर 200 खातेदारांची नोंद केली जाऊ शकते. म्हणून गावातील तंत्रस्नेही तरुणांनी ” ई- पीक पाहणी मित्र ” म्हणून पुढे यावे व ह्या योजनेला हातभार लावावा असे महसूल प्रशासनाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आले.