डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची ३१ मे पर्यंत मुदतवाढ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्याची ३१ मे पर्यंत मुदतवाढ
अहमदनगर, दि.०६ (जिमाका वृत्तसेवा)- अहमदनगर शहर आणि जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी इयत्ता अकरावी आणि बारावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वाधार योजनेमधून उपलब्ध करून देण्यात येतात.या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ मे २०२२ पर्यंत वाढविण्यात आली आहे. तेंव्हा पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी केले आहे.
याकरिता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षातील प्रवेशित अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याकरिता ३१ मार्च २०२२ हा अंतिम दिनांक देण्यात आली होती. परंतु २०२१-२२ या वर्षाची वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिताअर्ज करण्यासाठी अंतिम दिनांक ३१मे २०२२ करण्यात आली आहे.
या योजनेचा विहीत नमुन्यातील अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अहमदनगर येथे उपलब्ध आहेत. शासकीय वसतीगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या तसेच शासकीय वसतीगृहात प्रवेश न घेतलेल्या पात्र अनुसूचित जाती आणि नवबौध्द घटकातील इयत्ता अकरावी तसेच बारावी व इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावेत. असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री.देवढे यांनी केले आहे.