कर्जतचा सामाजिक सलोखा वाखान्याजोगा, प्रत्येकाचे सण-उत्सव आनंदाने साजरे करूयात – डॉ अजित थोरबोले.

कर्जत (प्रतिनिधी) : दि २ मे
कर्जतमधील सर्वधर्मीयांचे एकमेकांविषयी असणारे आदर, प्रेम निश्चित आनंददायी असून सर्व जन एकमेकांच्या सण-उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होत आपण एकच आहोत ही भावना जपत आहे ते निश्चित कौतुकास्पद आहे. प्रत्येक धर्माने माणुसकीची शिकवण दिली असून ती कायम मनात ठेवून आपले आचरण स्नेहपूर्वक ठेवावे आणि सामाजिक ऐक्य कायम राखावे असे प्रतिपादन प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले यांनी केले. ते कर्जत येथे पोलीस विभाग आयोजित शांतता समितीच्या बैठकीत बोलत होते.
यावेळी पोलीस उपअधीक्षक अन्नासाहेब जाधव म्हणाले की, प्रत्येकाने माणुसकीच्या भावनतेतून आपले आचरण, रीतिरिवाज पाळले पाहिजेत. समाजात वावरताना धर्मापेक्षा माणुसकीला प्रथम स्थान देणे आवश्यक आहे. प्रत्येक धर्मीय ग्रंथात याचमुळे माणुसकीला प्रथम स्थान देण्यात आले आहे. रमजान ईद आणि अक्षयतृतीया एकाच दिवशी येत असून सर्वांनी मोठ्या आनंदाने प्रेमपूर्वक साजरे करावे. कर्जतमधील जातीय-सलोखा प्रत्येक कार्यक्रमात दिसून येत असून तो निश्चित कर्जतकरासाठी अभिमानाची बाब आहे. तो कायम राहील यासाठी सर्वांनी विचार करणे आवश्यक आहे. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सर्वाना रमजान ईद आणि अक्षयतृतीयाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी मृत्युजय ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दीपक शहाणे, युवक काँग्रेसचे सचिन घुले, गटनेते संतोष मेहेत्रे, भाजपाचे अनिल गदादे, इल्लूभाई पठाण, जामा मशीदचे मौलाना आखलाक अहमद, आलमगीर मशीदचे मौलाना युसूफ यांनी कर्जतमधील अनेक सामाजिक सलोख्याचे प्रसंग प्रशासनासमोर सांगत आम्ही कर्जतकर एक आहोत. सर्व सण-उत्सव एकत्र येत साजरे करीत असून यापुढे देखील आम्ही सर्व गुण्या-गोविंदाने राहून सामाजिक सलोखा कायम राखू अशी ग्वाही प्रशासनास दिली. शेवटी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सर्वाचे आभार मानले. यावेळी सर्व समाजाचे प्रतिनिधी, नगरसेवक-नगरसेविका आणि पत्रकार उपस्थित होते.