देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि.१८ – पारधी समाज व वंचित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाने विविध कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. मात्र अनेकदा या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे त्यांच्या विकासाची गती मंदावते. पारधी समाज तसेच वंचित घटकांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते, तहसीलदार शरद घोरपडे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पारधी समाजाला समान संधी देणे गरजेचे आहे. त्यांचा सर्वांगीण विकास साधावा. आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांना सक्षम करावे. यासाठी प्रशासनाने अधिक संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. समाजातील युवकांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगार मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
अनुसूचित जाती आणि जमातींसाठी केंद्र तसेच राज्य शासन अनेक योजना राबवत आहे. मात्र लाभार्थ्यांना या योजनांची माहिती नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. या योजनांचा प्रचार व प्रसार करावा. रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध कर्ज योजनांचा लाभ मिळवून द्यावा. अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी.
आदिवासी वस्त्यांना आवश्यक सोयीसुविधा द्याव्यात. वीज, पाणी, रस्ते यासह सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध कराव्यात. अशा सूचनाही ॲड. लोखंडे यांनी दिल्या.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा