ब्रेकिंग

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करा-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहिल्यानगर दि.15- भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांनी निवडणूक आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर,निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील आणि विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय इमारती आणि त्यांच्या संरक्षक भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, कापडी फलक, कटआऊट, जाहिरात फलकावरील संदेश, झेंडे इत्यादी तात्काळ काढावीत. सार्वजनिक जागेवरील सर्व राजकीय जाहिराती, भित्तीपत्रके आदीदेखील काढावे. बसस्थानक, बसथांबा, रेल्वे पुल, एसटी महामंडळाच्या बसेस व विद्युत व टेलिफोन खांब, यावरील जाहिराती काढणे बंधनकारक आहे. याबाबत संबंधित यंत्रणेने तातडीने कार्यवाही करावी.
मालमत्ता विद्रुपण रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा-१९९५ मधील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. शासकीय संकेतस्थळावरील, राजकीय व्यक्तींचे छायाचित्र तसेच नावे वगळण्याची कारवाई करावी. शासकीय इमारतींचे सुरू असलेले बांधकाम, विविध विकास कामांसंदर्भातील माहिती संबंधित विभागाने तात्काळ जिल्हा निवडणूक शाखेकडे कळवावी. आचारसंहिता काळात सर्व यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दक्ष राहावे तसेच निवडणूकीतील कामांची आवश्यक माहिती ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे