शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या तात्काळ आवरा – किरण काळे ; जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे शहर काँग्रेसची शिष्टमंडळाद्वारे मागणी अन्यथा शहरामध्ये मुंबईत प्रमाणे तसे गॅंगवॉर्स होतील, काळेंनी व्यक्त केली चिंता

अहमनगर दि.२६ जून (प्रतिनिधी) : ओंकार उर्फ गामा भागानगरे या हिंदुत्ववादी चळवळीतील तरुण कार्यकर्त्याच्या मन सुन्न करणाऱ्या हत्याकांडामुळे नागरिक भयभीत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आहे की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. नगर शहराचा बिहार झाला आहे. अवैध धंद्यांच्या प्रकरणातूनच सदर हत्याकांड झाले आहे. असे असतानाही आजही राजरोसपणे शहरात अवैध धंदे सुरू आहेत. हे धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या तात्काळ आवरा, असा गर्भित इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी काँग्रेसच्या वतीने दिला आहे.
काळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन देत सविस्तर चर्चा केली. यानंतर ते बोलत होते. यावेळी दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला मनसुख संचेती, रतिलाल भंडारी, अलतमश जरीवाला, उषाताई भगत, शैलाताई लांडे, अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, आकाश आल्हाट, किशोर कांबळे, आकाश गायकवाड, गौरव घोरपडे, सुनील लांडगे, विकास भिंगारदिवे, सोफियान रंगरेज, गणेश आपरे, धनंजय देशमुख, प्रणव मकासरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळे म्हणाले, मुळात त्या रात्री तिहेरी हत्याकांड करण्याचा डाव होता. तो फसला. अवैध धंद्यांच्या तक्रारी वरून हत्याकांड घडल्याची फिर्याद आहे. सखोल तपासातून या मागील विविध कांगोरे समोर येतील. आरोपी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. यापूर्वी देखील याच कार्यकर्त्यांकडून एसपी कार्यालयावर हल्ला झाला आहे. एसपी कार्यालय शहरात असून देखील राजकीय वरदहस्थातून गुन्हेगारी, राजरोसपणे अवैध धंदे करणाऱ्यांना पोलिसांचा धाक वाटू नये ही पोलीस प्रशासनाला अंतर्मुख करायला लावणारी गंभीर बाब आहे.
हृदयद्रावक हत्याकांड घडून देखील बिंगो, मटका, जुगार, सट्टा, सोरट यासह सर्व अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. धंद्यांना राजकीय पाठबळ आहे. त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी विशेष मोहीम गरजेची आहे. अन्यथा शहरामध्ये पूर्वी मुंबईत घडायचे तसे गॅंग वॉर्स होतील. राजकीय वरदहस्थातून अनेकांचे मुडदे पडतील. यातून शहराला काळीमा फासण्याचे काम होत आहे. मात्र यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे. गुन्हेगारीतून तरुणाईने नेमका कोणता आदर्श राजकीय व्यवस्था व गुन्हेगारी जगताकडून घ्यावा ? दाऊद इब्राहिम, छोटा राजन, मन्या सुर्वे पासून ते शहरातील हत्याकांड करणारे आरोपी हे तरुणाई समोर आदर्श म्हणून पुढे येणार असतील तर अहमदनगरचे भवितव्य अंध:कारमय असल्याची चिंता काळेंनी यावेळी व्यक्त केली.
काँग्रेसने मागणी केली की, कोतवाली, तोफखाना, भिंगार व एमआयडीसी हद्दीतील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करावेत. छापेमारी करत गुन्हे दाखल करावेत. दोन पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशा गुन्हेगारांना राजकीय हस्तक्षेप झूगारून तात्काळ हद्दपार करावे. एमपीडीए, मोक्का अंतर्गत कारवाया कराव्यात. फरार तिसऱ्या आरोपीला तात्काळ अटक करावी.
दरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या अज्ञात फोनवरून येत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर करत पक्षाची, नेत्यांची बदनामी केली जात आहे. अकाउंट हॅक होत आहेत. याबाबत गुन्हे झाले आहेत. हत्याकांड, दहशत, गुन्हेगारी, अवैध धंदे, मनपातील भ्रष्टाचार, रस्त्यांचा महाघोटाळा या विरुद्ध काँग्रेस सातत्याने जनहितासाठी आवाज उठवत आहे. काँग्रेसचा जनहितार्थ असणारा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. दाखल गुन्ह्यांचा सखोल तपास करत संबंधित गुन्हेगारांच्या मुसक्या आवळा, अशी शहर काँग्रेसने मागणी केली आहे.