शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रशिक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा जिल्ह्यात २३ हजार रोजगार निर्माण होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीराचे जिल्ह्यात यशस्वी आयोजन नामांकित ३०० पेक्षा अधिक कंपन्यांचा महारोजगार मेळाव्यात सहभाग व मेळाव्याला तरूणांचा उदंड प्रतिसाद

शासन राज्यातील लाखो तरूणांना प्रशिक्षित करून रोजगार देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रशिक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जिल्ह्यात दोन ठिकाणी संत गाडगेबाबा कौशल्य प्रबोधनी सुरू करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
अहमदनगर दि. २८ फेब्रुवारी (प्रतिनिधी )बेरोजगारीवर मात करण्यासाठी शासन प्रमाणिक प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच जर्मनीबरोबर सामंजस्य करार केला असून यामाध्यमातून ४ लाख बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देऊन नोकरी दिली जाणार आहे. दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत ३ लाख ७३ हजार कोटींचे करार करण्यात आले असून यातून २ लाख तरूणांना रोजगार निर्माण होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या विभागीय नमो महारोजगार रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून २ लाखांपेक्षा जास्त रोजगार उपलब्ध होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली. नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरास त्यांनी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून थेट सहभागी होत मार्गदर्शन केले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग व जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभाग विभागीय नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त डॉ.पकंज जावळे, कौशल्य विकास विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त सुनिल सैंदाणे, जिल्हा कौशल्य, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
राज्यात नागपूर, लातूर नंतर अहमदनगर येथे नमो विभागीय रोजगार मेळावा होत आहे. असे नमूद करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शासन हे सर्वसामान्य लोकांचे आहे. तरूणांना रोजगार देण्यासाठी शासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे. राज्यात सर्व विभागात रोजगार मेळावे आयोजित केले जात आहेत. येत्या काळात बेरोजगार तरूणांच्या दारात जाऊन शासन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. शासन आपल्या दारी उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात अडीच कोटी लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळाला. अशाच प्रकारे रोजगार मेळाव्यातून लाखो तरूणांना रोजगार मिळून तरूण त्यांच्या पायावर उभे राहून सक्षम होणार आहेत.
प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रांतून ५० हजार तरूणांना प्रशिक्षण- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ध्वनीमुद्रीत दृकश्राव्य संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश दिला. ते म्हणाले की, राज्य शासन सातत्याने कौशल्य विकासावर भर देत आहे. राज्यात दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात घेण्यात आला. ३४ जिल्ह्यातील २५० तालुक्यातील ५११ गावात या केंद्रांची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्रातून दरवर्षी ५० हजार तरुण- तरुणींना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहेत. प्रत्येक उद्योग व रोजगारक्षम युवा यांच्या संवादातून सुद्धा अनेक संधी निर्माण होत असतात. रोजगार मिळणे हे कुटुंबाच्या समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक असते. या रोजगार मेळाव्यात प्रत्येकाला आपल्या गुणवत्तेनुसार, कौशल्याप्रमाणे रोजगार मिळेल. हा नमो महारोजगार मेळावा अनेक युवक-युवतींना आपल्या पायावर उभा करणारा ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.