राजकिय

अतिवृष्टीमुळे बाधित क्षेत्रांचे सरसकट पंचनामे करावेत – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुढील दोन दिवसात महसूलमंत्री अतिवृष्टीत तालुक्यांची करणार पाहणी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमांतून घेतला जिल्हा प्रशासनाचा आढावा

शिर्डी, २२ ऑक्टोंबर (प्रतिनिधी) – ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे काम करावे. येत्या दोन दिवसात जिल्ह्यातील नुकसान झालेल्या काही भागांना भेटी देऊन पाहणी करणार आहे. यावेळी सर्व शासकीय यंत्रणेने उपस्थित रहावे. अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीतून केल्या.
अहमदनगर जिल्ह्यात झालेली अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, पशुधनावरील ‘लम्पी’ आजार व ‘आनंदाचा शिधा’ कीट वाटपाचा आढावा महसूलमंत्री तथा पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी शिर्डी येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला अहमदनगर येथून जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप उपस्थित होते. तर शिर्डी येथून अपर जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, शिर्डी प्रांतधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोरोले तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार,तालुका कृषी अधिकारी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठकीला उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांची माहिती सांगितली.

पालकमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, जून ते सप्टेंबर या महिन्यात झालेल्या पावसापेक्षा सर्वाधिक पाऊस ऑक्टोंबर महिन्यात झाला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. शेवगाव, जामखेड, राहूरी, नेवासा, कोपरगांव या तालुक्यातील सर्वाधिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. तेव्हा प्रशासनाने सरसकट शंभर टक्के पंचनामे करण्याचे काम करावे. दिवाळी असतांना मी स्वत: काही तालुक्यांतील नुकसानग्रस्त भागांना भेटी देणार आहे. यावेळी पशुसंवर्धन अधिकाऱ्यांपासून तहसीलदार, गटविकास अधिकारी तलाठी, कृषी सहाय्यक अशा सर्व तालुका शासकीय यंत्रणेने उपस्थित रहावे.
पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोग आजारात पशुधनाचा मृत्युदर वाढत आहे. त्या संदर्भात सर्वच तहसीलदारांनी यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. ‘लम्पी ’लसीकरण आणि जिल्ह्यात उपलब्ध औषध साठा याचा प्रशासनाने आढावा घेऊन उपाय योजना कराव्यात अशा सूचना ही यावेळी महसूलमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
शासनाच्या ‘आनंदाच्या शिधा’ या कीट वाटपाचा पालकमंत्री श्री.विखे-पाटील यांनी आढावा घेतला. श्री.विखे पाटील म्हणाले, जिल्ह्यात ४ लाख ९० हजार ६८५ कीट आनंदाचा शिधा कीट प्राप्त आहेत. हे कीट दिवाळीपूर्वी गोरगरीब लाभार्थ्यांपर्यंत पोहचले पाहिजेत. यासाठी प्रशासनाने कामात अधिक सुसूत्रता आणत प्रभावीपणे काम करावे. अशा सूचना ही महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे