राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे चावला हाफ मर्डर बनावाचा मास्टर माईंड – किरण काळे संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात आहे, काँग्रेसचा गंभीर आरोप

अहमदनगर दि. 30 डिसेंबर (प्रतिनिधी) : हर्षद चावला याच्यावर कोणीही हल्ला केलेला नाही. हाफ मर्डरचा केवळ बनाव रचला आहे. चावला हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. या बनावाचा खरा मास्टरमाईंड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे आहे. खोसेला मुख्य आरोपी करून तात्काळ त्याच्यावर भा. द. वि. १२० ब प्रमाणे कटकारस्थान, षडयंत्र रचल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी. तसेच या बनाव प्रकरणात राष्ट्रवादी कामगार आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजेंद्र भांडवलकर, कार्यकर्ता सुरज जाधव, सचिन दगडे यांना देखील आरोपी करण्यात यावे, अशी मागणी शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे. ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांच्या हत्येचा कट शिजवला जात आहे. त्यासाठीच त्यांचे पोलीस संरक्षण काढून घेण्याची मागणी चावला सातत्याने राष्ट्रवादीच्या सांगण्यावरून करत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसच्या वतीने काळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
यावेळी संजय झिंजे, मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनिस चुडीवाला, विलास उबाळे, अलतमश जरीवाला, विकास भिंगारदिवे, किशोर कोतकर आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसने पत्र परिषदेत चावला याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मदत करतानाचे सिव्हील हॉस्पिटल येथील माहिती अधिकारात मिळालेले सीसीटीव्ही फुटेज दाखवत गंभीर आरोप केले आहेत. काळे म्हणाले, गुन्हा घडलेलाच नाही. खोसे व चावला यांनी संगनमत करत खून करण्याच्या दृष्टीने हल्ला झाल्याचा बनाव करत कट शिजवला होता. यासाठी प्लॅनिंग केले गेले. त्याकरिता दिवस, वेळ, जागा निश्चित केली गेली. आम्ही हल्लेखोर पाठवत चावला याला संपवून टाका, काटा काढा, सोडू नका, जिवे मारून टाका असे म्हणत मला आणि झिंजे यांना गोवण्याचा कट शिजला. आधी तीन लोकांना आरोपी करण्यात आले त्यांच्या तोंडी आमच्या नावे घातली गेली. नंतर पोलीस तपासात आमच्यावर १२० ब प्रमाणे कट रचल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्याचे षडयंत्र कोतवाली पोलीस स्टेशनच्या काही लोकांना हाताशी धरून रचण्यात आले. ज्या तिघांना पोलिसांनी आरोपी केले आहे त्या तिघांनीही हल्ला केला नसल्याचे स्पष्ट करत आपल्याजवळ तसे पुरावे असल्याचे म्हटले आहे. याकडे काळे यांनी लक्ष वेधले. कोतवाली निरीक्षकांकडे लेखी अर्ज, समक्ष भेट, फोन, पाठपुरावा करुन एफआयआरची प्रत मागितली. आम्हाला ती सुध्दा दिली नसल्याचा आरोप काळेंनी केला.
कोतवालीवर आरोप :
काळे पुढे म्हणाले अनेक दिवसांपासून हे प्लॅनिंग केले गेले आहे. कोतवाली पोलीस निरीक्षक यांनी राजकीय दबावातून कोणतीही शहानिशा न करता घाईघाईने हाफ मर्डरचे ३०७ हे गंभीर कलम लावलं. यासाठी डॉक्टरांचे प्रमाणपत्र घेतले नाही. कोतवाली पोलीस स्टेशन हे राष्ट्रवादी भवन झाले आहे. खोटेनाटे गुन्हे दाखल करून शहरातील राजकीय कार्यकर्त्यांसह अनेकांना उध्वस्त करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. कोतवालीला सक्षम, दबंग, निष्कलंक अधिकाऱ्याची गरज आहे. तथाकथित हल्ला झाल्यानंतर कोतवाली पोलीस निरीक्षकांना कोणाकोणाचे फोन आले त्याचा सीडीआर काढावा. खोसे, भांडवलकर, चावला, सुरज जाधव, सचिन दगडे यांचा मागील सहा महिन्यांचा सीडीआर व एसडीआर तपासावा. चावला आधी पोलिसांनी अवैध धंद्याची माहिती देण्याची माहिती आरोपींना दिल्याचे स्टेटमेंट प्रसारमाध्यमांना दिले होते. मात्र प्रत्यक्ष फिर्यादीत पोलिसांनी ते नोंदवलेच नाही.
हल्ला झाल्याचे साडेनऊ वाजता फिर्यादीत म्हटले आहे. चावला प्रत्यक्षात अकराच्या सुमारास सिव्हिलला पोहोचला. केडगाव ते सिव्हील अंतर केवळ पंधरा मिनिटांचे आहे. मग दीड तास चावला कुठे होता ? या काळात त्याने कोणाकोणाशी संपर्क केला ? सिव्हीलला येऊन जाण्याची केवळ प्राथमिकता पूर्ण केली गेली. डॉक्टरांना टाके घालू दिले नाहीत. येताना चावला नीट चालत आला. सिव्हिलला कॅज्युटी मधून त्याने मीडियाला बाईट दिल्या. जाताना मात्र व्हीलचेअर मागवण्यात आली. गाडीत तो स्वतः उठून बसला.
आयुर्वेद महाविद्यालयाचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घ्यावे :
कटाचा मास्टरमाईंड अभिजीत खोसे हा नियोजनाप्रमाणे पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा गाडीतून चावला याला सिव्हिल हॉस्पिटल येथे घेण्यासाठी आला. ते सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. खोसे याने चावलाला सावेडी उपनगरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये स्वतःहून दाखल केले. राष्ट्रवादीशी निगडित कोणतेही प्रकरण असले की त्याच ठराविक हॉस्पिटलचे नाव पुढे का येते ? त्या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही देखील ताब्यात घ्यावे ? घटना घडल्याच्या मार्गाचे फुटेज तपासावे. या कटासाठी शहरातील आजी-माजी आमदार पिता पुत्रांचे मार्गदर्शन आहे. कोण कोण गुन्हेगार त्यांच्या आयुर्वेद महाविद्यालयातील कार्यालयात येतात याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावे. त्यांच्यावर कारवाई करावी.
आमदारांच्या दबावातून हद्दपारचा प्रस्ताव फेटाळला :
सुरज जाधव याचा पोलिसांनी पाठवलेला हद्दपारचा प्रस्ताव चार महिने प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या टेबलावर धुळखात पडून होता. आमदारांच्या राजकीय दबावातून प्रांताताधिकार्यांनी तो फेटाळून लावला. चावला कटात जाधव याचाही सहभाग आहे. यापूर्वी तुझा गामा भागानगरे करू असे म्हणत जाधव याने आपल्या टोळीसह झिंजे यांना मारण्यासाठी गाठण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. त्याचेही सीसीटीव्ही फुटेज आहे. गुन्हा देखील दाखल आहे. म्हणूनच जिल्हा पोलीस अधीक्षकांनी बंदूकधारी पोलीस संरक्षण दिले आहे. चावला सातत्याने झिंजे यांचे संरक्षण काढण्याची मागणी करत आहे. अर्ज करत आहे. मीडियाला बाईट देत आहे. चावलाची ही विचित्र मागणी कशासाठी आहे ? त्याला ही मागणी कोण करायला लावत आहे ?चावला आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नेमके काय शिजले आहे ? याचा सखोल तपास पोलिसांनी करावा. झिंजे यांचे संरक्षण काढून त्यांची हत्या करण्याचा कट राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि जे गॅंग यांच्याकडून शिजविला जात आहे. भागानगरे हत्याकांड अजूनही ताजे आहे. झिंजे यांची हत्या झाल्यास याला सर्वस्वी कोतवाली पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. कोणत्याही परिस्थितीत त्यांचे संरक्षण पोलिसांनी काढू नये अशी काँग्रेसची मागणी आहे.
खोसे हा एसपी ऑफिस हल्ला प्रकरणातील आरोपी आहे. मनपा श्वान निर्भीजीकरण घोटाळ्यात देखील सहभागी आहे. खोसेसह, भांडवलकर, जाधव, दगडे या टोळीला शहरासह लगतच्या पाच जिल्ह्यांमधून तात्काळ तडीपार करण्यात यावे. नगरकरांनी राजकीय नेतृत्वाला नव्हे तर एका गुंडाला निवडून दिले असल्याची जनभावना निर्माण झाली आहे. दहशतीमुळे उघडपणे लोकं बोलत नाही. पण आमच्यापाशी तशी खंत व्यक्त करतात. शहराच्या राजकारणाचे पूर्णतः गुन्हेगारीकरण झाले आहे. तरुण पिढी बरबाद होत आहे. व्यापारी, उद्योजक, कष्टकरी, सामान्य माणूस त्रस्त आहे. पोलीस प्रशासनाने शहराचा श्वास मोकळा केला पाहिजे.
गृहमंत्री फडणवीस, एसपींना भेटणार :
सीसीटीव्ही फुटेजचे पुरावे देत कटकारस्थान रचणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सोमवारी करणार आहे. चावला प्रकरण गंभीर आहे. शहरात पोलिसांना हाताशी धरून सर्रासपणे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. शहरातील राजकीय गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्या उखडून टाकण्याच्या मागणीसाठी गृहमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची मी समक्ष भेट देऊन मागणी करणार असल्याचे काळे म्हणाले.
नगरकर हो, डरो मत :
काँग्रेस कार्यकर्ते शहराच्या राजकीय गुंडांना घाबरत नाहीत. नगरकरांनीही घाबरू नये. नगरकरांचे संरक्षणासह शहर विकास हे काँग्रेसचे ब्रीदवाक्य आहे. काँग्रेसचा संघर्ष निर्भीडपणे सुरूच राहील. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात आणि किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात डरो मत अभियान राबविले जात आहे. आता ते अधिक व्यापकपणे काँग्रेस कार्यकर्ते राबवतील. नागरिकांनी अभियानाच्या 9028725368 या हेल्पलाईनवर केव्हाही मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन काँग्रेसने केले आहेत.
बार कौन्सिलला पत्र देणार :
चावला हा ब्लॅकमेलिंग करतो. तसे स्टेटमेंट काही लोकांनी दिले आहेत. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल आहेत. त्याने वकील असून देखील कायद्याचा दुरुपयोग करत हत्या करण्याच्या प्रयत्नाचा बनाव रचला आहे. वकिली पेशावर चावला सारख्या लोकांमुळे नाहक बदनामीची वेळ येत आहे. सगळेच वकील असे नाहीत. चावला हा अपवाद आहे. त्याची सनद रद्द करण्याची मागणी बार कौन्सिलला पत्र देऊन करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.