संभाव्य आपत्तीच्या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी सज्ज राहावे पुरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवाऱ्यांचे नियोजन करा जिल्ह्यातील विविध पाणी साठवण प्रकल्पांची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करा:जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 28 मे (प्रतिनिधी )- मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणांनी संबंधीत सज्ज राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सुन पुर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना जिल्हाधकारी श्री सालीमठ बोलत होते.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे हे प्रत्यक्ष तर शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, जिल्ह्यातील मान्सुन कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सर्वोतोपरी सज्ज राहावे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती उदभवल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे निवाऱ्यांची पहाणी करुन त्याबाबत सुक्ष्म असे नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, पाणी आदी व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. जिल्ह्यात असलेल्या विविध पाणी साठवण प्रकल्पांसह साठवण तलाव, पाझर तलाव आदींची पहाणी करण्यात यावी. ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता असेल ती तातडीने करुन घेण्यात यावी. आपत्तीच्या काळामध्ये विद्युत पुरवठा तसेच दुरध्वनी सेवा अखंडित सुरु राहील याची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. पूरप्रवण, तलाव क्षेत्रामध्ये गावशोध व बचाव पथक आदी व्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
मान्सून कालावधीत रस्त्यांवर पाणी साठल्यामुळे अनेकवेळा अपघात घडतात. ज्या ठिकाणी अशा प्रकारे पाणी साठून अपघात घडतात अशा अपघातांच्या ठिकाणी बोर्डस, रिफ्लेक्टर लावण्यात यावेत. अनेकवेळा पाऊस व वाऱ्यामुळे झाडे रस्त्यांवर उन्मळून पडतात ज्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशी झाडे तातडीने बाजूला करून वाहतुक सुरळीत होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. पावसाळ्यात पाण्यामुळे एस. टी. बसेस बंद पडतात.परिणामी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. त्यामुळे एस. टी. बसेसची आवश्यकतेनुसार दुरुस्ती करून घेण्याबरोबरच एस.टी.बसेस ट्रॅकिंग सिस्टीम अद्यावत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिले.
नैसर्गिक आपत्तीच्या काळात जनावरांना मुबलक प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता ठेवण्यात यावी. तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरे मृत्युमुखी पडल्यास ज्या जनावरांचे टॅगिंग करण्यात आले आहे अश्याच जनावरांच्या मालकांना शासनामार्फत मदत करण्यात येते. त्यामुळे प्रत्येक जनावरांचे इयर टॅगिंग होईल, यादृष्टीने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
मान्सुन कालावधीत पसरणाऱ्या साथींच्या रोगापासुन बचाव होण्यासाठी तसेच रोगराई पसरल्यास निदानासाठी उपायोजना आखुन ठेवण्याबरोबरच प्रत्येक शासकीय रुग्णांलयांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधीचा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या शोध व बचाव साहित्यांची तपासणी करण्यात येऊन काही बिघाड असल्यास ते तातडीने दुरुस्त करुन घेण्यात यावे. जिल्ह्यातील शाळाखोल्यांची, अंगणवाड्यांची गरजेनुसार दुरस्ती करुन घेण्यात यावी. आपत्तीच्या काळात 24 तास नियंत्रण कक्ष सुरु राहील,याची दक्षता घ्यावी. महानगरपालिका व नगरपालिका हद्दीमध्ये धोकादायक असलेल्या इमारतींची पहाणी करुन त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. शहरांमध्ये ड्रेनेज चोकअपमुळे अनेकवेळा पाण्याचा निचरा होत नाही. ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
आपत्तीच्या काळामध्ये झालेल्या नुकसानीचे संयुक्तरित्या पंचनामे करण्यात येऊन त्याचा अहवाल सादर करण्यात यावा. तसेच या काळात नागरिकांनी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही, यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. आपत्ती काळात कोणीही मुख्यालय न सोडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी दिले..
बैठकीस जलसंपदा, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम,आरोग्य, पाणीपुरवठा, महानगरपालिका, विद्युत व जलसंधारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते..