प्रशासकिय

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे: जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर दि. 14 ऑक्टोबर (प्रतिनिधी ):- समाजातील सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. याप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही शासन अनेक योजना राबवित असून या योजनांचा लाभ घेत तृतीयपंथीयांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे तृतीयपंथीयांसाठी एक दिवसीय विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
व्यासपीठावर सहायक आयुक्त राधकिसन देवढे, तहसिलदार विशाल नाईकवडे, जिल्हास्तरीय तृतीयपंथीय तक्रार निवारण समिती सदस्या काजलगुरु नगरवाले, सदस्य किरण नेटके, पोलीस निरीक्षक श्रीमती तारडे, एड्स नियंत्रण विभागाचे अधिकारी डॉ. शिवाजी जाधव, नायब तहसिलदार सुधीर उबाळे, नायब तहसिलदार विक्रम पवार, बार्टीचे प्रकल्प अधिकारी लिलावर सय्यद आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून सर्वसामान्यांचा विकास साधण्यासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न केले जातात. तृतीयपंथीयांनी स्वतः च्या पायावर उभे राहावे, समाजामध्ये मानाने जगण्याचा अधिकार मिळून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. तृतीयपंथीयासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती करून घेत त्याचा लाभ घ्यावा व या योजनांची सर्वदूर जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी केले.
तृतीयपंथीयांनी छोटे छोटे उद्योग उभारून स्वतः च्या पायावर उभे राहावे यासाठी तृतीयपंथीयांना उद्योग उभारणीसाठी बँकांकडून कर्ज मिळवून देण्यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल. तसेच तृतीयपंथीयासाठी हौसिंग कॉलनी उभारण्यासाठीही जागा राखीव ठेवण्यात आली असल्याचे सांगत तृतीयपंथीयांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी या शिबिरात आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. तसेच तज्ज्ञांमार्फत कायदेविषयक माहितीही देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री सालीमठ यांनी यावेळी केले.
*तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी व कायदेविषक मार्गदर्शन*
तृतीयपंथीयांसाठी आयोजित एक दिवसीय विशेष शिबीरामध्ये तृतीयपंथीयांच्या आरोग्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. तसेच आरोग्याविषयी व ताण-तणावाविषयी मार्गदर्शनही केले. तसेच तृतीयपंथीय व्यक्तींचे सामाजिक प्रश्न व त्यांचे हक्क या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजकल्याण निरीक्षक संगीता चितळे यांनी केले.
कार्यक्रमास संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच तृतीयपंथीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे