देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे – आ. मदनमोहन झा

देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे – आ. मदनमोहन झा
अहमदनगर दि.२१ (प्रतिनिधी) : काँग्रेस पक्षाला एकशे पस्तीस वर्षांचा इतिहास आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या लढ्यात काँग्रेसने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. महाराष्ट्र काँग्रेसने देशाला अनेक मोठमोठे नेते दिले आहेत. देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन बिहार प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आ. मदनमोहन झा यांनी केले आहे.
प्रदेशाध्यक्ष आ. मदनमोहन झा शिर्डी येथे आले असता अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, अनंतराव गारदे, अनिस चुडीवाला, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे, प्रवीण गीते पाटील, स्वराज शिर्डीकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. झा म्हणाले की, सध्या देशात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम सुरू आहे. सर्व राज्यांमध्ये जास्तीत जास्त सभासद नोंदणी करण्याचे काम पक्ष करत आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा आणि विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी पूर्वीपासून पक्षाचा जनाधार राहिलेल्या मतदारांना पुन्हा पक्षाशी जोडण्यासाठी कार्यकर्त्यांनी सुरू केलेली मोहीम काँग्रेसला आगामी काळात अधिक बळकट करेल, असा विश्वास झा यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी किरण काळे यांनी अहमदनगर शहर व जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सुरू असणाऱ्या डिजिटल सभासद नोंदणी अभियान व अन्य उपक्रमांची माहिती आ. झा यांना दिली. यावेळी पक्षबांधणी संदर्भात शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत झा यांनी मार्गदर्शन केले.