महिला सक्षमीकरणावर केंद्र शासनाचा भर – केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल केंद्रीय योजनांच्या लाभार्थींंशी संवाद

*शिर्डी, दि.२९ सप्टेंबर (प्रतिनिधी) – महिलांचे सक्षमीकरणावर केंद्र शासनाचा भर आहे. अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये २० लाख महिला काम करतात. देशाच्या विकासात महिला बचतगट व प्रक्रीया उद्योगातील महिलांचे अमूल्य योगदान आहे . असे मत देशाचे अन्नप्रक्रिया उद्योग व जल शक्ती केद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी आज येथे व्यक्त केले.
श्रीरामपूर येथे आज केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी केंद्रीय राज्यमंत्र्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राहूल आहेर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सुरेश शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) श्रीमती रेश्मा होजगे, राजेंद्र गोंदकर आदी उपस्थित होते.
केंद्रीय राज्यमंत्री श्री.पटेल म्हणाले,
देशात छोटे-मोठे उद्योग करणाऱ्या २० लाख महिला आहेत. अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी दरवर्षी ३५ हजार लघुउद्योगांना कर्ज देण्याचे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. याचबरोबर जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येकास पिण्यायोग्य ५५ लीटर पाणी उपलब्ध होणार आहे. असे असले तरी पाण्याचा जपून वापर केला पाहिजे.
कोवीड काळात देशातील प्रत्येक कुटुंबाला मोफत अन्नधान्य देण्यात आले. मोफत कोवीड लसीकरण करण्यात आले. देशातील लोकांना मोफत औषधोपचार करून जगातील १५० पेक्षा जास्त देशांना आपण औषधे वाटप केली. असेही श्री.पटेल यांनी सांगितले.
भारत सध्या जगाची पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. असे नमूद करत श्री. पटेल म्हणाले, २०३० पर्यंत भारताला जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनविण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे. त्यादृष्टीने सर्वसामान्यांच्या विकासासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाला काम करायचे आहे.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, केंद्रशासन शिक्षणापासून ते आरोग्यापर्यंतच्या सर्व मूलभूत गरजांवर काम करत आहे . मोफत लसीकरण, मोफत धान्य वाटप, उज्ज्वला गॅस, आयुष्यमान भारत आरोग्य योजना या केंद्रांच्या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या जीवनात मूलभूत परिवर्तन झाले आहे. सध्या देशात सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. या पंधरवड्यात सर्व सामान्य नागरिकांचे शासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा करण्याचे काम प्रशासनाने करावे. नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत. यांची दक्षता घ्यावी.
यावेळी कामगार कल्याण विभागामार्फत साहित्य मिळालेल्या बांधकाम कामगारांचा केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.